फुटपाथवर उभारण्यात आलेल्या रंगीबेरंगी पथदिपांची दुरवस्था : निधीअभावी देखभाल करण्यास मनपा अपयशी
प्रतिनिधी /बेळगाव
शहराच्या सौंदर्यीकरणासाठी महापालिकेच्या माध्यमातून आणि स्मार्ट सिटीच्या योजनेंतर्गत कोटय़वधी निधी खर्ची घालण्यात येत आहे. शहराच्या विविध रस्त्यांशेजारी डेकोरेटिव्ह पथदीप बसविण्यात आले आहेत. विशेषतः खानापूर रोडशेजारील फुटपाथवर उभारण्यात आलेल्या रंगीबेरंगी पथदिपांची दुरवस्था झाली असून काही दिवे गायब झाले आहेत. त्यामुळे याकरिता खर्ची घालण्यात आलेला निधी वाया गेला असल्याच्या प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.
मागील 13 वर्षांत 1500 कोटीचे अनुदान केवळ शहराच्या विकासासाठी खर्ची घालण्यात आले आहे. मुख्यमंत्री शहर विकास अनुदानांतर्गत शहराच्या विकासासाठी 2008 पासून आतापर्यंत 400 कोटीचे अनुदान मंजूर झाले होते. तसेच स्मार्ट सिटी योजनेंतर्गत 1 हजार कोटीचा निधी खर्च करण्यात आला आहे. महात्मा गांधी शहर विकास अनुदानातून 125 कोटीचे अनुदान मंजूर झाले आहे. या निधीअंतर्गत शहरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण, डेकोरेटिव्ह पथदिपांची उभारणी, गटारींचे बांधकाम, रस्त्यांवर पेव्हर्स घालणे तसेच विविध विकासकामे राबविण्यासाठी निधी खर्ची घालण्यात आला आहे.
विद्युतवाहिन्यांसाठी 400 कोटी
त्याचप्रमाणे भूमिगत विद्युतवाहिन्यांसाठी 400 कोटीहून अधिक निधी हेस्कॉमच्या योजनेंतर्गत खर्च करण्यात आला आहे. तसेच शहरात पाईपलाईनद्वारे गॅसपुरवठा करण्याचे कंत्राट बांधा, वापरा आणि हस्तांतर करा या तत्त्वावर देण्यात आले आहे. त्यामुळे गॅसलाईन घालण्याकरिता गॅस कंपनीकडून निधी खर्च करण्यात येत आहे. तसेच डेनेजवाहिन्या आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणीसाठी 150 कोटीचे अनुदान अमृत योजनेंतर्गत मंजूर करण्यात आले असून सदर काम सुरू
आहे.
24 तास पाणीपुरवठा योजनेकरिता जागतिक बँकेच्या माध्यमातून 600 कोटीचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. तर शहराच्या विकासासाठी इतके अनुदान मंजूर होऊनदेखील देखभालीसाठी कोणतीच तरतूद करण्यात आली
नाही.
शहरातील रस्त्यांच्या विकासाबरोबर सौंदर्यीकरणासाठी कोटय़वधीचा निधी खर्च केला जातो. डेकोरेटिव्ह पथदीप बसविण्यात आले आहेत. शहरातील मुख्य रस्त्यांवर बसविण्यात आलेले डेकोरेटिव्ह पथदीप काही महिन्यांत बंद पडत आहेत. ‘नव्याचे नऊ दिवस’ या म्हणीप्रमाणे शहर-उपनगरांतील डेकोरेटिव्ह पथदीप काही दिवसांतच बंद पडले आहेत. पहिल्यांदा काँग्रेस रोड आणि आरपीडी रोडवर डेकोरेटिव्ह पथदीप बसविण्यात आले होते. देखभालीअभावी काही महिन्यांतच पथदिपांची दुरवस्था झाली होती. त्यानंतर खानापूर रोडवर पथदीप बसविण्यात आले होते. पण सदर पथदीपदेखील खराब झाले असून काही दिवेच गायब झाले आहेत.
जनतेच्या निधीचा दुरुपयोग…
माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांचे नाव देण्यात आलेल्या जुना धारवाड रोड, हनुमाननगर तसेच शहरातील विविध रस्त्यांशेजारी पथदीप बसविण्यात आले होते. मात्र सर्व डेकोरेटिव्ह पथदीप खराब झाले असून दुरवस्था झाली आहे. याची देखभाल महापालिकेकडून केली जात नाही. तसेच देखभालीकरिता निधीची तरतूदही करण्यात आली नाही. विकासासाठी कोटीचा खर्च केला जातो. पण देखभालीअभावी खर्ची घातलेला निधी वाया जात आहे. त्यामुळे जनतेने कररूपी भरलेल्या निधीचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.