व्हर्च्युअल सभेत पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या सातव्या व आठव्या टप्प्यातील मतदारांसाठी दिल्लीतूनच व्हर्च्युअल जाहीर सभेत भाषण केले आहे. अनेक मतदारसंघांमधील मैदानांमध्ये एलईडी स्क्रीन लावून त्यांचे भाषण दाखविण्यात आले. कोणत्याही ठिकाणी 500 हून अधिक गर्दी न होण्याची दक्षता भाजप कार्यकर्त्यांनी घेतली होती, असे सांगण्यात आले. पश्चिम बंगालच्या विकासाकडे गेली चार दशके सातत्याने दुर्लक्ष झाले असून स्थायी विकासासाठी प्रथम शांतता निर्माण होणे आवश्यक आहे. राजकीय सूडबुद्धी संपण्याची आवश्यकता आहे. तसेच विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जनतेच्या सुखदुःखाशी समरस होऊन कार्य करणे आवश्यक आहे. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते या कामात आधीपासूनच मग्न आहेत, असे प्रतिपादन करतानाच त्यांनी मतदारांना निर्भयपणे आणि मोठय़ा संख्येने मतदान करून भाजपला विजयी करण्याचे आवाहन केले.