सरकारकडून निधी मंजूर न होताच उद्घाटने : नवीन ग्रा.पं.सदस्यांच्या कारभारामुळे अधिकारी त्रस्त
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव तालुक्मयात आता नवीन ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य झाले आहेत. मात्र यामधील काही अध्यक्ष आणि सदस्य नको त्या कामांचा शुभारंभ करून नागरिकांची दिशाभूल करत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. त्यामुळे याचा फटका सरकारी अधिकारी वर्गाला बसताना दिसत आहे. सरकारकडून निधी मंजूर नसतानाही कोटींची विकासकामे आपण करत असल्याचे भासवून अनेकांची दिशाभूल करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यापुढे सरकारकडून मंजूर झाल्यानंतरच या विकास कामांचा शुभारंभ करावा, अशी मागणी होत आहे.
बेळगाव तालुक्मयातील पश्चिम भागातील एका नामवंत ग्राम पंचायतीमध्ये असे प्रकार घडत आहेत. सरकारकडून कोणताच निधी उपलब्ध नसतानाही आणि कोणत्याही लोकप्रतिनिधींच्या फंडातूनही निधी मंजूर नसतानाही कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला आहे. यामुळे संबंधीत ग्रामविकास अधिकाऱयांची मोठी गोची झाली आहे. काही ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य विकासकामांचे उद्घाटन करत आहेत. याची माहिती संबंधित ग्राम विकास अधिकाऱयांनाही नसते. मग हा निधी आणणार कोण आणि ती कामे होणार कशी? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
बेळगाव तालुक्मयातील अनेक ग्राम पंचायतींमध्ये क्वचितच असे प्रकार घडत आहेत. मात्र पश्चिम भागातील एका ग्राम पंचायतमध्ये हा प्रकार सर्रास सुरू आहे. त्यामुळे जर विकास साधायचा असेल तर पहिल्यांदा त्याचा ठराव ग्राम पंचायतमध्ये व्हायला हवा. त्यानंतर तो निधी सरकारकडून मंजूर व्हायला हवा. त्यानंतर उद्घाटनाचा कार्यक्रम होतो. विशेष म्हणजे या उद्घाटनावेळी ग्राम विकास अधिकाऱयांची उपस्थिती गरजेची आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. संबंधित मोजकेच सदस्य व अध्यक्ष विकासकामांची कुदळ मारुन नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रकार सुरू असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे ज्या विकास कामांचा शुभारंभ केला आहे तो कोणत्या योजनेतून केला आहे किंवा त्यासाठी विशेष निधी राखीव ठेवला आहे का? यासह इतर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. त्यामुळे याकडे जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकाऱयांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
विकासकामाला सरकारची मंजुरी आवश्यक
तालुक्मयात असे प्रकार होत असतील तर ते चुकीचे आहे. महत्त्वाचे म्हणजे ज्या विकास कामांचे उद्घाटन करण्यात येते त्याची मंजुरी सरकारने देणे बंधनकारक आहे. जर त्याची मंजुरी नसतानाही उद्घाटन करण्यात येत असेल तर ते चुकीचे आहे. अशा प्रकारांमुळे ग्राम विकास अधिकाऱयांना नाहक त्रास सहन करावा लागतो. संबंधित विकास कामांच्या उद्घाटनांची माहिती अधिकाऱयांनाच नसेल तर ती कोणत्या योजनेतून किंवा कोणत्या राखीव फंडातून मंजूर झाली आहेत हे आपणही सांगणे चुकीचे आहे. सरकारकडून अधिकृत माहिती असेल तरच कोणताही सरकारी अधिकारी अशा उद्घाटनांना उपस्थित राहू शकतो.
-ता.पं.कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी