निपाणी शहर ग्रामीण भागात वर्दळ थंडावली
प्रतिनिधी/ निपाणी
राज्यात हळूहळू वाढत चाललेला कोरोनाचा प्रादुर्भाव तसेच नजीकच्या महाराष्ट्र व केरळ राज्यातील वाढलेले रुग्ण लक्षात घेऊन राज्य सरकारने सीमेवरील जिल्हय़ांमध्ये विकेंड तसेच नाईट कर्फ्यू लागू करण्याचा आदेश दिला. त्यानुसार शनिवारपासून निपाणी शहर व ग्रामीण भागात याची काटेकोर अंमलबजावणी सुरू झाली आहे.
शुक्रवारी कर्फ्यू संदर्भातील आदेश लागू होताच व्यावसायिकांची एकच तारांबळ उडाली. विकेंड कर्फ्यू या की पुढच्या शनिवारपासून याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली होती. मात्र शुक्रवारी रात्री शहरात पोलीस प्रशासनाने व ग्रामीण भागात ग्राम पंचायत प्रशासनाने स्पीकरद्वारे जनजागृती करत विकेंड कर्फ्यू सुरू झाल्याचे सांगितले. शुक्रवारी रात्री आदेशाबाबत पूर्ण माहिती नसल्यामुळे शनिवारी काही गावांमध्ये किराणा दुकानेही बंद करण्यात आली होती. निपाणी शहरात मात्र दुपारी दोन वाजेपर्यंत किराणा, दूधविक्री, हॉटेल, वाईन शॉप, चिकन, मटण दुकाने, फळेविक्री सुरू असल्याचे दिसून आले.
एप्रिल अखेरीस कोरोनाची दुसरी लाट वाढल्यामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे सुमारे दोन महिने व्यावसायिकांना मोठा त्रास झाला. गेल्या एक-दीड महिन्यात हळूहळू व्यवसाय स्थिर होता. मात्र आता पुन्हा आठवडय़ातील दोन दिवस व्यवसाय बंद ठेवावा लागणार आहे. त्यामुळे व्यावसायिकांतून नाराजी व्यक्त होत होती. असे असले तरी वाढते कोरोना रुग्ण लक्षात घेता सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून घेण्यात आलेला हा निर्णय योग्य असल्याचे मतदेखील व्यक्त होत आहे.
बस सुरू पण प्रवासीच नाहीत
विकेंड लॉकडाऊनमुळे बस सुरू असणार की नाही? याबाबत संभ्रमावस्था होती. याबाबत निपाणी आगाराशी संपर्क साधला असता बस सुरू असल्याचे सांगण्यात आले. मात्र विकेंड लॉकडाऊनमुळे प्रवाशांचा बसला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे बसफेऱयाही कमी करण्यात आल्या.
संकेश्वरात अत्यावश्यक सोडून अन्य व्यवहार बंद
संकेश्वर ः यंदा मे महिन्यापासून सुरु असलेल्या लॉकडाऊन परिस्थितीत सातत्य येऊ लागल्याने गरीब, कष्टकरी वर्गावर आर्थिक कुऱहाड कोसळली आहे. जुलै महिना लॉकडाऊन उठविताना पुन्हा हाताला काम देणारा ठरल्याने सर्वांनी मोकळा श्वास घेतला. पण महापुराच्या फटक्याने त्यातही अनेक अडचणी निर्माण झाल्या. दरम्यान सीमाभागात कोरोनाच्या धास्तीने विकेंड कर्फ्यू जाहीर करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी शनिवारी पहिल्या दिवशी करण्यात आली. संकेश्वरातही पोलिसांनी कडक अंमलबजावणी केल्याचे पहावयास मिळाले. दरम्यान पुन्हा विकेंड लॉकडाऊन घोषित केल्यामुळे लॉकडाऊनचा पुन्हा ससेमिरा सर्वसामान्यांना भेडसावत आहे. यामुळे पुन्हा रोजंदारीचा प्रश्न काहींना निर्माण झाला आहे. असे असले तरी पुन्हा लॉकडाऊनची वेळ येऊ नये, यासाठी नागरिकांनी कोरोना नियमावलीचे नियम पाळणे आवश्यक आहे.