अनावश्यकपणे फिरणाऱयांवर होणार कारवाई दूध, भाजीविक्रीसाठी सकाळी चार तास परवानगी
प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोना नियंत्रणासाठी राज्यात शुक्रवारी रात्रीपासूनच विकेंड कर्फ्यू जारी झाला आहे. या कालावधीत कोणकोणत्या सेवा सुरू असतील, यासंबंधी महसूलमंत्री आर. अशोक यांनी माहिती दिली आहे. अत्यावश्यक सेवांना मात्र सूट असणार असून कोविड मार्गसूचीचे पालन करणे अनिवार्य आहे. नियमांचे उल्लंघन किंवा अनावश्यक फिरणाऱयांवर कठोर कारवाई करण्याची सूचना पोलिसांना देण्यात आली आहे.
विकेंड कर्फ्यू शुक्रवारी रात्री 9 ते सोमवारी सकाळी 6 पर्यंत असणार आहे. या कालावधीत कोणाकोणाला बाहेर पडण्यास परवानगी असेल, याविषयी महसूल मंत्र्यांनी माहिती दिली आहे. अत्यावश्यक सेवा पुरविणाऱया कंपन्या सुरु ठेवण्यात मुभा देण्यात आली आहे. टेलिकॉम, इंटरनेट सेवा पुरविणाऱयांनाही कर्फ्यू कालावधीत वावरता येणार आहे. रुग्णांना व त्यांच्या सोबत असणाऱयांना कर्फ्य कालावधीत उपचाराकरिता इस्पितळापर्यंत किंवा इस्पितळातून घरी परतण्याची मुभा आहे, अशी माहितीही महसूलमंत्री आर. अशोक यांनी बेंगळूरमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली.
किराणा, मांस, भाजीपाला, फळे, दूधविक्रीची दुकाने केवळ सकाळी 6 ते 10 या चार तासांच्या कालावधीत सुरू राहणार आहेत. हॉटेल रेस्टॉरंटमधील पार्सल सेवाही सुरू राहणार आहे. दुसऱया जिल्हय़ात किंवा परराज्यात जाणाऱयांना मुभा आहे. त्यासाठी त्यांना बस, प्रवासी टॅक्सी किंवा ऑटोरिक्षाचा वापर करावा लागेल. रेल्वे, विमान प्रवासासाठी बुकींग केलेले तिकीट दाखविणे अनिवार्य आहे.
विवाहासाठी 50 जणांना, अंत्यविधीसाठी 20 जणांना एकत्र येण्याची मुभा आहे. चित्रपटगृहे, जीम, स्टेडियम, बार पूर्णपणे बंद राहणार आहेत. मशिद, चर्च, मंदिरे व इतर धार्मिक स्थळे बंद असतील.
वाणिज्य-उद्योग खात्याचीही मार्गसूची
विकेंड कर्फ्यू कालावधीत कोणाकोणाला सूट देण्यात आली आहे, यासंबंधी वाणिज्य आणि उद्योग खात्यानेही मार्गसूची जारी केली आहे. कंपन्या, कारखान्यांमधील कामगारांना ओळखपत्र असल्याशिवाय कामाच्या ठिकाणापर्यंत जाता येणार नाही. मात्र, अकारण फिरणाऱयांवर कारवाई केली जाणार आहे. औषध उत्पादन, फॉर्मास्यूटीकल, सॅनिटायझर उत्पादन, ऑक्सिजन, वैद्यकीय उपकरणे व वैद्यकीय क्षेत्रासंबंधी कर्मचाऱयांना विकेंड कर्फ्यू कालावधीत सेवा पुरविण्यावर निर्बंध असणार नाहीत. आहार उत्पादन, सैन्यदलाशी संबंधित कारखाने, सिमेंट, खते, साखर, पेट्रोलियम, इलेक्ट्रॉनिक्स, पेपर मिल, ऑटोमोबाईल उत्पादने निर्मिती क्षेत्रालाही सूट दिली आहे.
बस सुरु; पण…
राज्यात विकेंड लॉकडाऊन जारी झाला असला तरी राज्य सरकारने अत्यावश्यक सेवा पुरविण्यास केएसआरटीसी आणि बीएमटीसीला परवानगी दिली आहे. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी विकेंड कर्फ्यू दरम्यानही परिवहनच्या बसेस सुरू राहणार आहेत, अशी माहिती केएसआरटीसीने दिली आहे. तथापि, प्रवाशांची संख्या आणि आवश्यकतेनुसारच बसेस सोडल्या जाणार आहेत. बसमधून प्रवास करणाऱयांना कोविड 19 मार्गसूचीचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.
कृषी क्षेत्राला सूट…
शुक्रवारी रात्रीपासून जारी झालेल्या विकेंड कर्फ्यू दरम्यानही कृषी आणि कृषीपुरक व्यवसायांना कोणतेही निर्बंध असणार नाहीत. शेतकऱयांना बाजारपेठेपर्यंत उत्पादने वाहतूक करण्यासाठी कोणीही अडवणूक करू नये, असे कृषी मंत्री बी. सी. पाटील यांनी सांगतिले आहे. शुक्रवारी सायंकाळी पत्रकारांशी ते बोलत होते. विकेंड कर्फ्यू, जनता कर्फ्यू शेतकऱयांना लागू असणार नाही. फुले, फळे, धान्य, भाजीपाला बाजारपेठेपर्यंत नेण्यासाठी शेतकऱयांना कोणतेही प्रतिबंध शेतकऱयांची वाहने पोलीस किंवा आरटीओनी अडवून त्रास देऊ नये, अशी सूचनाही देण्यात आल्याचे ते म्हणाले.