प्रशासनाची साथ, शहरातील बरेच व्यवहार ठप्प,शहराच्या उत्तर भागात तुरळक वाहतूक,उद्यमबाग येथील उद्योग सुरळीत सुरू
प्रतिनिधी/ बेळगाव
विकेंड कर्फ्यूची सरकारची व प्रशासनाची सूचना मान्य करून पुन्हा एकदा बेळगावकर विकेंड कर्फ्यूला सामोरे गेले. वास्तविक पहाता आता कोणतेही उद्योग व्यवसाय बंद ठेवण्याची बेळगावकरांची मानसिकता नाही. परंतु आरोग्याचा विचार करून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केले. आणि साडेपाच महिन्यानंतर पुन्हा एकदा बेळगावमधील बरेच व्यवहार थंडावले.
शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून विकेंड कर्फ्यूला सुरूवात झाली. प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार व्यापारी व दुकानदारांनी दुकाने बंद केली. शनिवारी सकाळी देखील ज्या दुकानांना व व्यवसायांना परवानगी देण्यात आली आहे ती खुली करण्यात आली. इतर व्यवहार मात्र ठप्प होते. भाजीपाला, फळे, दुग्धजन्य पदार्थ खरेदी करण्यासाठी काही भागात तुरळक गर्दी झाली होती. यामुळे रस्त्यावर देखील काही प्रमाणात वाहतूक दिसून आली. सात ते आठ महिन्यांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा विकेंड कर्फ्यू बेळगावच्या नागरिकांनी अनुभवला.
वडगाव– शहापूरमध्ये दुकाने बंद
शुक्रवारी रात्रीपासूनच वडगाव, शहापूर, जुनेबेळगाव परिसरात दुकाने बंद ठेवण्यात आली होती. शनिवारी सकाळी पेपर वितरक, दूध विपेते यांच्याखेरीज रस्त्यावर शांतता होती. वडगाव येथील बाजारगल्ली, दत्त गल्ली, येळ्ळूर रोड, धामणे रोड, रयत गल्ली, आनंदनगर या परिसरातील दुकाने बंद ठेवली होती. खासबागमध्येही चिकन व मटण दुकाने वगळता इतर दुकाने बंद होती. खडेबाजार शहापूर येथे सुवर्णकारांनी दुकाने बंद ठेवली होती. मेडिकल वगळता इतर सर्व व्यवहार ठप्प होते. रस्त्यावरून मात्र तुरळक प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू होती.
अनगोळ, टिळकवाडी येथे संमिश्र प्रतिसाद
अनगोळ, टिळकवाडी येथे शनिवारी सकाळच्या सुमारास काही प्रमाणात तुरळक गर्दी होती. काही दुकानदारांनी दुकानेही सुरू केली होती. पोलिसांनी सूचना केल्यानंतर दुकाने बंद करण्यात आली. अनगोळ, भाग्यनगर या परिसरात किराणा मालाची दुकाने वगळता इतर व्यवहार ठप्प होते. ठिकठिकाणी भाजी खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडत असल्याचे चित्र या भागात दिसले.
शहराच्या उत्तर भागात तुरळक वाहतूक
कोरोना आवाक्मयात आणण्यासाठी प्रशासनाने विकेंड कर्फ्यू जारी केला आहे. याला बेळगाव उत्तर विभागातून चांगला प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा, भाजीपाला, फळे, यांचे स्टॉल वगळता इतर सर्व व्यवहार ठप्प होते. नेहरूनगर, सदाशिवनगर, शिवाजीनगर, शिवबसवनगर, या परिसरात तुरळक वाहतूक सुरू होती. ज्यांना महत्त्वाची कामे आहेत असे नागरिक घराबाहेर पडताना दिसून आले.
प्रशासनाने विवाह सोहळय़ांना मर्यादित संख्येची परवानगी दिली आहे. त्यामुळे विवाह सोहळे वगळता चित्रपटगृह, जलतरण तलाव, जीम आणि फिटनेस सेंटर, मंदिरे, लॉन्ड्री, सलून दुकाने यासह अनेक उद्योग व्यवसाय बंद होते.
हॉटेलांमधून पार्सल सेवा सुरू
शुक्रवारी रात्री 8 पासूनच हॉटेल्स बंद करण्यात आली होती. ज्या ग्राहकांना हॉटेलमधील पदार्थ हवे आहेत. त्यांच्यासाठी पार्सल सेवा सुरू ठेवण्यात आली होती. शनिवारी सकाळपासूनच पार्सल सेवा देणाऱयांची संख्या वाढली होती. काही ग्राहक हॉटेलपर्यंत जाऊन तेथून आपल्याला हवे ते पदार्थ खरेदी करीत होते. हॉटेलबरोबरच कुरियर सेवा देखील सुरू ठेवण्यात आली होती.
उद्यमबाग येथील उद्योग सुरळीत सुरू
विकेंड कर्फ्यूमधून औद्योगिक कामगारांना मुभा देण्यात आल्याने शनिवारी उद्यमबाग व परिसरातील औद्योगिक वसाहती सुरळीत पद्धतीने सुरू होत्या. सकाळी कामगारांना ओळखपत्र पाहून पोलिसांनी कामावर जावू दिले. यामुळे विकेंड कर्फ्यूचा तितकासा परिणाम जाणवला नाही. लहान उद्योगांपासून मोठे उद्योगांपर्यंत सर्वच उद्योग सुरू होते. उद्योगांना लागणारी हार्डवेअरची दुकाने सुरू असल्याने औद्योगिक कामगारांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.
सेकंड सॅटर्डेमुळे आर्थिक व्यवहार थंडावले
विकेंड कर्फ्यू त्यातच सेकंट सॅटर्डे असल्यामुळे शनिवारी बँका, सोसायटय़ा, सहकारी संस्था बंद ठेवण्यात आल्या होत्या. यामुळे ग्राहकांनी ऑनलाईन आर्थिक व्यवहार केले. सरकारी सुटी असल्यामुळे खरेदी विक्रीचे व्यवहारही ठप्प होते. यामुळे एकूणच शनिवारी आर्थिक व्यवहार थंडावल्याचे चित्र दिसून आले.