अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद – शहरवासीयांचा प्रतिसाद
प्रतिनिधी/ निपाणी
कोरोना रुग्णसंख्या कमी होऊ लागल्यानंतर हळूहळू निर्बंध शिथिल होऊ लागले आहेत. मात्र विकेंड लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी होत आहे. निपाणीत शनिवारी विकेंड लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता बहुतांशी व्यवहार ठप्प झाल्याचे पहायला मिळाले. सोमवारी सकाळनंतर सदर व्यवहार सुरळीत होणार आहेत.
विकेंड लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी सहानंतर सर्व व्यवहार ठप्प झाले होते. शासनाच्या नियमानुसार सकाळी 6 ते 2 पर्यंत किराणा दुकाने तसेच अन्य व्यवहार सुरू ठेवण्यास परवानगी असली तरी शनिवारी बहुतांशी किराणा व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने व्यवहार बंद ठेवले. केवळ दवाखाने, औषध दुकाने सुरू होती. असे असले तरी रस्त्यांवर नागरिकांची गर्दी पहायला मिळाली. निपाणी आगारातून बससेवा सुरू होती. मात्र प्रवाशांचा त्याला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.
गेल्या शनिवारी आणि रविवारी विकेंड लॉकडाऊनमध्ये व्यापारी आणि विक्रेत्यांना पोलीस प्रशासनावतीने आवाहन केले होते. याला प्रतिसाद देताना व्यापाऱयांनी आपले व्यवहार सकाळी 6 ते 2 या वेळेतही बंद ठेवताना प्रतिसाद दिला होता. या आठवडय़ातील विकेंड लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी म्हणजे शनिवारी शहरातील व्यापारी आणि विक्रेत्यांनी आपले व्यवहार बंद ठेवताना पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.
शहर व उपनगरात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख घटत आहे. ही दिलासादायक बाब असली तरी शहरात सध्या सुमारे शंभर रुग्ण सक्रीय आहेत. त्यामुळे हा आकडा वाढणार नाही, याची जबाबदारी नागरिकांवर आहे. मे महिन्यात शहरातील दवाखान्यांमध्ये कोरोना रुग्ण वाढल्यामुळे बेडचा तुटवडा निर्माण झाला होता. मात्र आता बहुतांशी बेड रिकामे असून सक्रीय रुग्ण हे होमक्वारंटाईन आहेत. तिसऱया लाटेचा धोका कायम असून नागरिकांनी यापुढेही कोरोना नियमावलीचे गांभीर्याने पालन करावे, असे आवाहन प्रशासनावतीने केले जात आहे.