शाळांबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी पातळीवर होणार : हॉटेल, बार-रेस्टॉरंटमध्ये 50 टक्के ग्राहकांना प्रवेश : सुधारित मार्गसूची जारी
प्रतिनिधी /बेंगळूर
कोरोना नियंत्रणासाठी राज्यात जारी करण्यात आलेला विकेंड कर्फ्यू सरकारने रद्द केला आहे. त्यामुळे आज शनिवारपासून विकेंड कर्फ्यू राहणार नाही. त्यामुळे विकेंडला सर्व व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत. दरम्यान, नाईट कर्फ्यूच्या नियमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे दररोज रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत नाईट कर्फ्यू राहणार आहे. इस्पितळांमधील कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाढल्यास पुन्हा विकेंड कर्फ्यू लागू करण्याचा इशारा सरकारने दिला आहे.
हॉटेल व्यावसायिकांसह अनेक उद्योजकांनी विकेंड कर्फ्यू रद्द करण्याची मागणी केली होती. शिवाय भाजपमधील काही नेत्यांनी देखील विकेंड कर्फ्यूला आक्षेप घेतला होता. त्यामुळे शुक्रवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या नेतृत्वाखाली 12 तज्ञांची बैठक झाली. यावेळी केवळ विकेंड कर्फ्यू रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती महसूलमंत्री आर. अशोक यांनी दिली. जनतेच्या आग्रहामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितले. सायंकाळी सरकारने सुधारित मार्गसूची जारी केली आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तरी त्याची तीव्रता कमी आहे. इस्पितळात दाखल होणाऱया कोरोनाबाधितांचा आकडाही कमी आहे. त्यामुळे तज्ञांसह अनेकांनी दिलेल्या सल्ल्यानुसार मुख्यमंत्र्यांनी विकेंड कर्फ्यू रद्द केला आहे. मात्र, नाईट कर्फ्यू कायम ठेवण्यात आला आहे. कोरोना नियंत्रणासाठी हॉटेल, पब, बार, रेस्टॉरंट, चित्रपटगृहे या ठिकाणी आसनक्षमतेच्या 50 टक्के जणांनाच प्रवेश देण्याचा नियम जारी आहे. हा नियम यापुढेही कायम राहणार आहे. विवाह समारंभांमधील उपस्थिती मर्यादेचा नियमही कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे मंत्री आर. अशोक यांनी सांगितले.
कोविड मार्गसूचीचे पालन करा
तज्ञांनी दिलेला अहवाल आणि राज्यातील इस्पितळांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण 5 टक्के आहे. हे प्रमाण वाढल्यास पुन्हा विकेंड कर्फ्यू लागू करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता सरकारने जारी केलेल्या कोरोना नियमांचे पालन करावे. संसर्ग वाढण्यासाठी कारणीभूत ठरू नका, अशी विनंती त्यांनी जनतेला केली.
विकेंड कर्फ्यू वगळता सर्व नियम आधीप्रमाणेच राहणार आहेत. दररोज रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत नाईट कर्फ्यू, आंदोलने, निदर्शने, मोर्चा, मिरवणूक, जत्रा यावर निर्बंध, गर्दी होणारे सभा-समारंभ यावर निर्बंध राहणार आहेत. बेंगळूर वगळता उर्वरित जिल्हय़ांमधील शाळांबाबत जिल्हाधिकारी निर्णय घेणार आहेत. 29 जानेवारीनंतर बेंगळूरमधील शाळा सुरू ठेवाव्यात की बंद, याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.
…तर शाळा तीन ते सात दिवस बंद राहणार
बेंगळूर वगळता राज्यातील सर्व शाळा नियमितपणे सुरू राहणार असल्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी स्पष्ट केले आहे. 29 जानेवारीपर्यंत बेंगळूरमधील शाळा बंद राहतील. त्यानंतर येथील शाळा सुरू कराव्यात का, याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. उर्वरित जिल्हय़ांमधील शाळांबाबत स्थानिक अधिकारी तेथील कोरोना परिस्थिती पाहून निर्णय घेतील. एखाद्या वेळेस एका शाळेत 5 मुलांना संसर्ग झाल्यास शाळा तीन दिवस बंद ठेवण्यात येतील. 25 ते 30 विद्यार्थ्यांना बाधा झाल्याचे आढळल्यास त्या शाळेला 7 दिवसांची सुटी देण्यात येईल, असेही शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले.