निपाणी,चिकोडी,संकेश्वर,रायबागातीलचित्र
प्रतिनिधी/ निपाणी
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन घोषित केला आहे. असे असतानाही कोरोना रुग्णसंख्या वाढतच चालली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी विकेंड लॉकडाऊन घोषित केला. दरम्यान याची अंमलबजावणी जिल्हय़ात कडक सुरू आहे. निपाणी, चिकोडी, संकेश्वर, अथणी आणि रायबाग शहरासह तालुक्यात पोलिसांनी कडेकोट अंमलबजावणी राबविली. यामुळे रस्ते आणि बाजारपेठांमध्ये सन्नाटा पसरला होता. दरम्यान विनाकारण फिरणाऱया वाहनधारकांची वाहने जप्त करण्यासह अनेकांना पोलिसी लाठीचा प्रसादही देण्यात आला.
जिल्हय़ासह राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यामुळे राज्य सरकारने राज्यात पहिला लॉकडाऊन दि. 10 ते 24 मे पर्यंत लागू केला. यानंतर यात वाढ करताना 25 मे ते 7 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला. असे असतानाही अद्याप कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येताना दिसत नाही. यात दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. यामुळे शनिवार व रविवार सर्व व्यवहार बंद ठेवताना विकेंड कर्फ्यू जाहीर केला. याची अंमलबजावणी जिल्हय़ात कडेकोट राबविण्यात येत आहे.
निपाणीत शनिवारी विकेंड कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी मुख्य बसस्थानक परिसर, अकोळ क्रॉस, जत्राटवेस, मुरगूड रोड, बेळगाव नाका, गांधी रुग्णालयनजीक बोगदा, कोल्हापूर रोड येथे पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला. शहरातील मुख्य रस्त्यांवर बॅरिकेड्स उभे करून मार्ग बंद करण्यात आले होते. तसेच विनाकारण रस्त्यावर फिरणाऱयांची 50 हून अधिक वाहने जप्त केली. तसेच दंडात्मक कारवाई आणि लाठीचा प्रसादही अनेकांना मिळाला. सीपीआप गुरुनाथ, बसवेश्वर पोलीस स्थानकाच्या पीएसआय अनिता राठोड, ग्रामीणचे पीएसआय बी. एस. तळवार आणि शहर स्थानकाचे पीएसआय अनिलकुमार कुंभार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी विकेंड कर्फ्यूची कडक अंमलबजावणी केली होती. यामुळे शहरातील रस्ते आणि बाजारपेठांमध्ये सन्नाटा पसरला होता.
संकेश्वरात दंडात्मक कारवाई, बैठकांची शिक्षा
संकेश्वर ः गत महिन्याभरात संकेश्वर व परिसरातील ग्रामीण परिसरात कोरोनाचे संकट गडद झाले आहे. याला पायबंद घालण्यासाठी तालुका प्रशासन, आरोग्य खाते, पोलीस विभाग आणि नगर परिषदेचे पदाधिकारी आणि कर्मचारी सेवा बजावित आहेत. शनिवारी विकेंड कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी कडेकोट बंदोबस्त ठेवताना अंमलबजावणी करण्यात आल्याने सर्वत्र शुकशुकाट पसरला होता.
सध्या 1 सरकारी व 4 खासगी कोविड केंद्रात कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. विशेषतः ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण अधिक आढळून येत आहेत. अद्याप ग्रामीण भागात कोरोनाचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागात कोरोना नियमावलीचे उल्लंघन करण्यात येत आहे. संकेश्वर शहरातील हौसिंग कॉलनी, क्वळ्ळी प्लॉट, जयगौडा पाटील प्लॉट, अंकले व निडसोशी रोड, बिरेश्वर नगर, जनता प्लॉट, संसुद्धी गल्ली, दुरदुंडेश्वर गल्ली, हनुमान नगर, बसवान गल्ली व नदी गल्ली आदी ठिकाणी काही प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. शनिवारी आदी भागात कडेकोट बंदोबस्त ठेवताना विकेंड कर्फ्यू कडक पाळण्यात आला. विनाकारण फिरणाऱयांना बैठकांची शिक्षा देण्यात आली. तसेच दुचाकी जप्त करण्यात आल्या. याबरोबरच नियमावलीचे उल्लंघन करणाऱयांकडून दंडही वसूल करण्यात आला.
रायबाग येथे कडक विकेंड कर्फ्यू
रायबाग ः जिल्हय़ात शनिवार व रविवार दोन दिवस विकेंड कर्फ्यू जिल्हाधिकाऱयांनी घोषित केला आहे. याची अंमलबजावणी रायबाग शहरात कडक राबविण्यात आल्याने शहरात पोलीस वगळता सर्वत्र सामसूम असल्याचे पहावयास मिळत होते. काही भागात घरोघरी फिरून भाजीपाला विक्री सुरू होती. पोलिसांनी शहरातील मुख्य चौकांमध्ये बॅरिकेड्स उभारून मार्ग बंद केले होते. रायबाग शहर व ग्रामीण भागात कोरोना नियंत्रणासाठी तालुका आरोग्य खाते व रायबाग नगरपरिषद आपापल्या कार्यक्षेत्रात खबरदारी व योग्य त्या उपाययोजना राबवित आहे. यासाठी रायबाग तहसीलदार डॉ. मोहन भस्मे, नगरपरिषद मुख्याधिकारी, मुख्य वैद्याधिकारी डॉ. आर. एच. रंगन्नवर हे युद्धपातळीवर काम करत आहेत. नागरिकांनीही लॉकडाऊन व विकेंड कर्फ्यूचे पालन करत प्रशासनास सहकार्य करून कोरोनाला दूर पळविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.