नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने लॉकडाऊन पाळला : शहरामधील रस्त्यांवर शुकशुकाट, अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार बंद
प्रतिनिधी / बेळगाव
ना वाहनांची वर्दळ, ना खरेदीसाठीचा गजबजाट रस्त्यावर केवळ निरव शांतता व शुकशुकाट असे चित्र शुक्रवारी बेळगाव शहर व परिसरात दिसून आले. प्रशासनाने जाहीर केलेल्या तीन दिवसांच्या विकेंड लॉकडाऊनला शुक्रवारी सकाळपासून सुरूवात झाली. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने हा लॉकडाऊन पाळला. त्यामुळे दिवसभरात कुठेही वर्दळ, गोंधळ, वाहनांची ये-जा दिसून आली नाही.
बेळगाव जिल्हय़ात कोरोना रुग्णांच्या संख्येत अद्यापही घट झालेली नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तीन दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. केवळ अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. हॉस्पिटल, मेडिकल, डेअरी, एटीएम, फुड डिलिव्हरी या सेवा सुरू ठेवण्याचे आदेश होते. या विकेंड लॉकडाऊनला शुक्रवारी सकाळपासून सुरूवात झाली. सकाळी दुध व वृत्तपत्र विपेते यांची वर्दळ काही प्रमाणात होती. त्यानंतर मात्र शहरात शुकशुकाट दिसून आला. शहरात येणा-जाणाऱया वाहनांचे क्रमांक पोलिसांकडून टिपले जात होते. तसेच विनाकारण फिरणाऱयांवर कारवाई केली गेली.
विकेंड लॉकडाऊन हा काही दिवसांपूर्वी जाहीर झाला असला तरी त्यापूर्वी रेल्वे प्रवाशांनी बुकिंग केले होते. त्यामुळे शुक्रवारी बेळगाव शहरात रेल्वेने दाखल झालेल्या प्रवाशांना लॉकडाऊनचा फटका बसला. रिक्षा वगळता इतर वाहने उपलब्ध नसल्याने तसेच त्यांच्या नातेवाईकांना रेल्वेस्थानकापर्यंत पोहोचणे कठिण असल्याने काहींनी चालत आपले घर गाठले. तर काही जणांना वाहने येईपर्यंत ताटकळत बसावे लागले.
एटीएम सुरू असल्याने नागरिकांतून समाधान
मागील आठवडय़ात केलेल्या विकेंड लॉकडाऊनमध्ये बँकांसोबतच एटीएम सेवाही शटडाऊन करण्यात आली होती. यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या तसेच उपचार घेत असलेल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना पैसे मिळविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. यामुळे विकेंड लॉकडाऊनमध्ये एटीएम सुरू ठेवण्याची मागणी करण्यात आली होती. अखेर या आठवडय़ात जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये एटीएम सुरू ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱयांनी घेतला. यामुळे शुक्रवारी दिवसभरात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना पैसे मिळविणे सोयीचे ठरले.
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामुळे मार्गात बदल
राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी शुक्रवारी बेळगाव जिल्हय़ाच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. सकाळी त्यांचा ताफा गुड्सशेडरोड परिसरात येणार असल्याने काहीकाळ मार्गात बदल करण्यात आला होता. कपिलेश्वर उड्डाणपुलावरून वाहतूक करणाऱयांना इतर मार्गाने जाण्याची सूचना करण्यात आली. अत्यावश्यक सेवा देणाऱया कर्मचाऱयांना मुख्यमंत्र्यांच्या या ताफ्याचा फटका बसला. यासोबत मुख्यमंत्र्यांच्या दौऱयामुळे शहरात सर्वत्रच कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे दिसून आले.