देशातील कोरोनाबाधितांची संख्या 40 लाखांच्या पार : दिवसभरात 70 हजार जणांना डिस्चार्ज
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतामध्ये दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 40 लाखांच्या पुढे गेली आहे. गेल्या 24 तासात देशात 86 हजार 432 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रासह दिल्ली, गुजरात, तामिळनाडू, मध्यप्रदेश आणि प. बंगालमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. मागील 24 तासात देशात 86 हजार 432 कोरोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या 40 लाख 23 हजार 179 इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे देशात आतापर्यत 31 लाख 7 हजार 223 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 8 लाख 46 हजार 395 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, देशात गेल्या 24 तासात 1 हजार 89 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात जवळपास 70 हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने शनिवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत देशात 69 हजार 561 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात मृत्यूदर 1.74 टक्के आहे.
सलग आठ दिवस दररोज 60 हजारांहून अधिक रुग्ण बरे होत आहेत. शनिवारपर्यंतच्या अखेरच्या चोवीस तासात तब्बल 70 हजार 72 रुग्णांना उपचाराअंती डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 77 टक्क्यांवर वर पोहोचले आहे. योग्य वैद्यकीय उपचारांमुळे दिवसेंदिवस अधिकाधिक रुग्ण बरे होऊन इस्पितळातून बाहेर पडत आहेत. गंभीर आजार असणाऱया केवळ 0.5 टक्के रुग्णांना कृत्रिम श्वसन यंत्रांवर ठेवण्यात आल्याचेही वैद्यकीय यंत्रणेकडून जाहीर करण्यात आले आहे. 3.5 टक्के रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे.
11 लाख 70 हजार चाचण्या
सलग दुसऱया दिवशी देशात 11 लाख 70 हजारांहून अधिक नमुना चाचण्या करण्यात आल्या. चाचण्यांचे प्रमाण वाढत असले तरी दैनंदिन संसर्गदर 7.5 टक्क्मयांपेक्षा कमी आहे. चाचण्यांचे प्रमाण वाढवल्यामुळे बाधितांचा आकडाही वाढत असला तरी डिस्चार्ज मिळणाऱयांचे प्रमाण वाढत असल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे.