केंद्र सरकारकडून राज्यांना सूचना : संबंधितांपासून कोरोना संसर्गाचा मोठा धोका असल्याचा इशारा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
किराणा दुकानातील कर्मचारी, भाजीपाला विक्रेते व फेरीवाल्यांची कोरोनो विषाणू चाचणी करण्याची सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य व केंद्रशासित प्रदेशांना केली आहे. फेरीवाले किंवा विक्रेत्यांच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात कोरोना संसर्ग लोकांमध्ये पसरण्याचा धोका असल्याने ही सूचना करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी राज्य व केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवून या सूचनेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचा संसर्ग देशात झपाटय़ाने वाढत चालला आहे. सध्या एका दिवसात जवळपास 60 हजारांहून अधिक रुग्णांची भर पडत चालली आहे. बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे केंद्र सरकारही चिंतेत आहे. सध्या देशात ‘अनलॉक-3’ सुरू असून अनेक सेवा-सुविधा सुरू झालेल्या आहेत. लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर अनेक लोक दैनंदिन व्यवहार किंवा कामा-धंद्याच्या निमित्ताने घराबाहेर पडू लागल्यामुळे संसर्ग वाढत चालला आहे. किराणा दुकाने, भाजीपाला, दूध यांच्यासह जीवनावश्यक सेवा लॉकडाऊन काळातही सुरू होत्या. त्यामुळे या सेवांशी संबंधित असलेले लोक इतर बऱयाच जणांच्या संपर्कात आलेले असल्याने त्यांची कोरोना विषाणू चाचणी करून घेणे महत्त्वाचे आहे. त्याच अनुषंगाने केंद्र सरकारने राज्यांना काही निर्देश जारी केले आहेत.
रुग्णवाहिका सेवा गतिमान असावी
सध्या अनेक लोक आजारी पडत असल्यामुळे त्यांच्यापर्यंत ऍम्ब्युलन्स म्हणजेच रुग्णवाहिका सेवा वेगाने कशी पोहोचेल याकडेही लक्ष देण्याची सूचना करण्यात आली आहे. रुग्णवाहिकांमध्ये ऑक्सिजन सुविधा असावी आणि गतीने रुग्णवाहिका वाहतूक यंत्रणा चालविण्यावर भर दिला जावा, असेही सरकारने म्हटले आहे. ही सेवा अतिशय पारदर्शक पद्धतीने चालविण्यात यावी आणि त्याच्यावर दररोज देखरेख ठेवणारी यंत्रणाही असायला हवी, असे सांगत रुग्णवाहिका न मिळाल्याच्या तक्रारी शून्यावर येणे अपेक्षित आहे, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
नवीन ठिकाणी प्रादुर्भाव टाळावा
कोरोनाचा प्रसार आता देशात नवीन भागात पसरत आहे. ‘अनलॉक’नंतर दैनंदिन व्यवहार सुरू झाल्याने लोकांची ये-जा वाढली आहे. त्यामुळेच आता मोठय़ा प्रमाणात प्रादुर्भाव होण्याची शक्मयता आहे. अशा स्थितीत विशेषत: नवीन ठिकाणी प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्याचे मुख्य लक्ष्य असायला हवे. तसेच लोकांचे अनमोल जीव वाचविण्यावर भर दिला पाहिजे, असे आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले.
मृत्यूदर नियंत्रणात यश
भारताने इतर देशांपेक्षा कितीतरी चांगले काम केले आहे. योग्य आरोग्य उपचारांमुळे मृत्यूचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यात भारताला यश आलेले आहे. मात्र अजूनही मृत्यूदर कमी व्हायला हवा. मृत्यूदर एक टक्क्यांपर्यंत नियंत्रित ठेवण्याचे उद्दिष्ट आपण बाळगायला हवे, असे मुख्य आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी अतिरिक्त मुख्य सचिवांसह आपल्या अन्य सहकाऱयांना लिहिलेल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे. संसर्गाच्या पहिल्या टप्प्यात केलेली चाचणी, तातडीने केलेले अलगीकरण किंवा वेळीच केलेले उपचार आणि योग्य वैद्यकीय व्यवस्थापन याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिल्यास मृत्यूदर नियंत्रणात येणार असल्याचा दावाही त्यांनी केला.
वृद्ध, गर्भवतींची घरोघरी तपासणी
जास्त जोखीम असलेल्या व्यक्ती, वृद्ध लोक, सहवासातील लोक आणि गर्भवती महिला ओळखण्यासाठी नियमितपणे घरोघरी शोध घ्यावा. यासह, नियंत्रण आणि बफर झोन स्थापित केले जावेत आणि नियंत्रण झोनची परिमिती निश्चित केली जावी. घरी केलेल्या तपासण्यांमध्ये संशयित रुग्ण आढळल्यास त्याला तातडीने वैद्यकीय इस्पितळात पाठविण्याची व्यवस्था करण्याचे निर्देशही केंद्र सरकारकडून संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.