पवित्र रिश्तासारख्या मालिकेमधून भारतीयांच्या घराघरात, मनामनात पोहोचलेला आणि आपल्याच कुटुंबातील वाटणारा सुशांतसिंग राजपूत या अवघ्या पस्तीशीतल्या प्रचंड लोकप्रिय अभिनेत्याने रविवारी जीवनयात्रा संपवली. चित्रपटसृष्टीत एखाद्याचे खच्चीकरण करणे, दुर्लक्ष करणे, चित्रपट पळवणे होतेच. याचा तो बळी आहे का याचीही चर्चा सुरू आहे. पण, या आत्महत्येमागे मानसोपचारतज्ञ जे कारण मानतात ते समाजाने समजून घेणेही अगत्याचे आहे. हे कारण आहे विचारदोषाचे किंवा विचार विकृतीचे…इरॅशनल थिंकिंग…वेडेपणाच्या विचाराचे! कोणत्याही कारणांमुळे मानसिक ताण आला किंवा दुःखाचा भर लवकर ओसरला नाही तर भावनांवर आणि विचारांवर नियंत्रण ठेवणे मुश्किल होते. मग तो हमाल, शेतकरी असो किंवा सेलिब्रिटी! भावनांवर नियंत्रणाचे तंत्र मनोरोगतज्ञ आणि मानसोपचार तज्ञांच्या मदतीने समजून घेतले तर अशा आत्महत्या टाळता येतात. पण, भारतात जवळपास एक लाख लोकांमागे एक मनोरोग तज्ञ आणि लाखामागे एक मानसोपचार तज्ञ असेल तर समाजात अशा उपचारांची उणीव राहणारच. हे ज्ञान घेतलेल्यांचीही उपेक्षा होणार आणि परिणाम समाजाला भोगावे लागणार. समाज आणि सरकार दोन्हींनी ही व्यवस्था सुधारणे गरजेचे. मनोरोगतज्ञांकडे जाऊन सल्ला, उपचार, मार्गदर्शन, कौन्सिलिंग करून घेणे म्हणजे आपण वेडे आहोत असे मानण्याचे कारण नाही. विचारदोष नाही असा जगात माणूस नसतो. पण तो दूर करता येतो! मनात येणाऱया वाईट विचारांचे कायम आवर्तन होत राहते. कितीही जवळच्या माणसांनी समजावले तरी ते क्षणभंगूर ठरते. मग विचारांच्या बाबतीत तज्ञांच्या मार्गदर्शनाअभावी आत्महत्याच घडतात. सुशांतची जवळपास 60 कोटीची इस्टेट, एकेका चित्रपटाचा शेकडो कोटींचा जमणारा गल्ला, म्हणजे भविष्यात यशाचीही हमी होतीच. जगातील नामवंत कंपन्यांच्या गाडय़ा रोजच्या वापरात असणारा, आलिशान बंगला असणारा, दुःखितांचे अश्रू पुसण्यासाठी कोटय़वधी रु. दान करणारा हा अभिनेता. याला कोणती दुःखे असू शकतील असा प्रश्न सहज मनात येतो. एकीकडे हातात पैसा नाही म्हणून नैराश्य आलेले शेकडो लोक आत्महत्या करत असताना ज्याची तिजोरी भरलेली आहे आणि ज्याला सदिच्छांचे प्रचंड मोठे पाठबळ लाभले आहे, अशाने आत्महत्या करणे लोकांना पटतच नाही. त्यातही विशेष म्हणजे नवयुवकांना आत्महत्येपासून परावृत्त करणाऱया ‘छिछोरे’ या चित्रपटात तुमचे जीवन हेच तुमचे सर्वस्व आहे असे सांगणाऱयाने स्वतःचे जीवन संपवले म्हटल्यानंतर आश्चर्य आणि हळहळ व्यक्त होणारच. बरोब्बर 25 महिन्यापूर्वी मुंबई एटीएसचे प्रमुख हिमांशू राय यांनी आत्महत्या केल्यानंतर समाज असाच अस्वस्थ झाला होता. पण, अशा घटना का घडतात याचा विचार केल्याशिवाय आणि त्या यापुढे कोणत्या कारणांमुळे वाढतील हे जाणल्याशिवाय अशा धक्क्यातून समाजाची मुक्तता होणार नाही. अपयश आणि नैराश्य कोणाला येत नाही? पण, या विचारांना कलाटणी द्यायची असेल तर त्या क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन हे घेतलेच पाहिजे. सुशांतसारख्या अभिनेत्याला ते शक्य होते. उपलब्ध माहितीनुसार त्याने त्यादिशेने पाऊलही उचलले होते. त्याला कौन्सिलिंगचा सल्लाही देण्यात आला होता. मात्र तो त्याने नीट पाळला नाही. निराशेवरील औषधे खाणेही त्याने सोडून दिले होते. त्याचा जवळचा मित्र त्याच्या सोबत रहायला आला होता. त्याने त्याच्या बहिणीला कल्पना दिल्यानंतर पाच दिवस तीही त्याच्या सोबत राहून गेली. वडिलांनी या स्थितीवर मात करण्यासाठी विवाह कर असा सल्ला दिला होता. नोव्हेंबरात विवाह झालाही असता. पण, त्यापूर्वीच एका कुविचाराने त्याच्या मनावर मात केली आणि होत्याचे नव्हते झाले. सर्वसामान्यांच्या बाबतीतही अशा निराशेतून बाहेर काढण्यासाठी मित्रांशी बोलणे, त्यांच्या सोबत प्रवासाला जाणे, देव, देवर्षी, भूत काढून आणणे असे प्रकार केले जातात. पण, दुर्दैवाने या विषयातील तज्ञांकडून मानसिक आरोग्यावर प्रबोधन करून घ्यावे असे वाटत नाही. समाजात अशा तज्ञांची, या क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते, प्रबोधक यांची कमतरता, याविषयाची पदवी घेऊनही समाजातून त्याला प्रतिसाद न मिळाल्याने अशा पदवीधरांनी मिळेल ती कामे किंवा आपले क्षेत्र सोडून भलतीकडेच नोकरीला दिलेले प्राधान्य, शासनाची दुरवस्था यामुळे हे क्षेत्रच दुर्लक्षिले गेले आहे. कौन्सिलिंग ही खर्चिक प्रक्रिया नाही. वर उल्लेखलेल्या उपायांपेक्षाही हे उपचार स्वस्त आहेत. पण, गरीबाला त्याची कल्पना नसते आणि श्रीमंतांचे नैराश्य आलेल्या पैशाचे नियोजन होत नाही म्हणून येणाऱया ताणातून अविवेकी कृतीत परावर्तीत होते. डॉ. येरॉन बेक, डॉ. अल्बर्ल्ट एलिस या मानसतज्ञांनी सुदृढ विचार कसे करायचे याबाबतीत जगाला विचार दिला आहे. कॉगनेटिव्ह सायको थेरपी जगासमोर आहे. समाजात मानसिक आरोग्याच्या जागृती आणि प्रबोधनाने या संकटावर मात करता येऊ शकते. यादृष्टीने लोकांचे प्रबोधन सरकारने केले पाहिजे. या क्षेत्रात काम करणाऱया डॉक्टरांनी समाजमाध्यमातून हा विचार पसरवला पाहिजे. मोठय़ांच्याबाबत चर्चा तरी होते. सर्वसामान्यांच्या आत्महत्येचा कोणीच विचार करत नाहीत. एखाद्या जिल्हास्तराच्या सरकारी दवाखान्यातही याविषयी पूर्णवेळ तज्ञाची नेमणूक नसते. पाच जिल्हय़ात एक डॉक्टर महिन्यातून कधीतरी येतो आणि दिवसात चार, पाचशे लोकांना तपासतो. त्यातून होणार काय? प्रत्येक दवाखान्यात डॉक्टर आणि समुपदेशक यांची संख्या किमान दहा होईल तेव्हा सामान्यांचेही प्रश्न सुटतील आणि सेलिब्रिटीही त्यावर सहजपणे बोलतील. कौन्सिलिंगचा, विचार सुदृढ करून घेण्याचा मार्ग अंगिकारतील. दीपिका पदुकोण ही अभिनेत्री याबाबतीत धाडसीच म्हणायचे. मी डिप्रेशनमध्ये गेले होते. मी माझे विचार तज्ञांच्या मदतीने दुरुस्त करून घेतले, विचारदोषांवर मात केली, असे ती ठामपणे सांगू शकली. आज ती यशाच्या शिखरावर आहे आणि हे वास्तव बोलते आहे. सुशांत या विचार दोषाच्या अनटोल्ड स्टोरीपर्यंत पोहोचू शकला नाही हे दुर्दैव! किमान त्याच्या मृत्यूनंतर तरी सरकार आणि समाजाने विचारदोषावरील उपचाराला गांभिर्याने घ्यावे.
Previous Articleराम शिंदेंना धक्का; जामखेडमध्ये भाजपला खिंडार
Next Article विदेशी गुंतवणूकदारांनी 20,574 कोटी गुंतवले
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.