कोसळलेल्या तटबंदीच्या पाहणीनंतर शिवसेनेचे नेते सतीश सावंत यांची माहिती
प्रतिनिधी / कणकवली:
ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी खासदार विनायक राऊत हे येत्या दोन दिवसांत केंद्रीय पुरातत्व विभागाकडे संपर्क साधून किल्ल्याच्या संवर्धनासाठी जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी पाठपुरावा करणार आहेत. कोसळलेल्या चिलखती तटबंदीची पाहणी करून त्याचा अहवाल खासदार राऊत यांना देण्यात येणार आहे. हा ऐतिहासिक ठेवा जोपासण्याच्या दृष्टिकोनातून शिवसेनेच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष, शिवसेना नेते सतीश सावंत यांनी दिली
ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्याच्या कोसळलेल्या चिलखती तटबंदीची पाहणी सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष सतीश सावंत व शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी गुरुवारी केली. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख विलास साळसकर, तालुकाप्रमुख मिलिंद साटम, ऍड. प्रसाद करंदीकर, जि. प. सदस्या वर्षा पवार, संतोष साटम, पुरळ विभागप्रमुख संदीप डोळकर, विजयदुर्ग शाखाप्रमुख सुरेंद्र सागवेकर, दामाजी पाटील, सिद्धेश डोंगरे, सचिन खडपे, अवधूत पाटील, सुनील खडपे, सचिन पवार, उपतालुखाप्रमुख सुनील जाधव, सलीम चौगुले आदी उपस्थित होते.
विजयदुर्ग किल्ल्याची तटबंदी कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर खासदार विनायक राऊत हे बुधवारी पाहणी करण्यासाठी येणार होते. मात्र, त्यांना तातडीने एका बैठकीसाठी दिल्ली येथे जावे लागल्याने त्यांच्या आदेशानुसार आम्ही सर्व शिवसेना पदाधिकारी तटबंदीची पाहणी करून त्याचा अहवाल खासदार राऊत यांना देणार आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही किल्ल्याच्या संवर्धनासाठी विशेष सकारात्मकता दाखविली आहे. विजयदुर्ग किल्ल्याचे संवर्धन करणे ही आमची जबाबदारी आहे, त्यामुळे केवळ निवेदन देऊन आम्ही थांबणार नाही, तर कोसळलेल्या तटबंदीसह संपूर्ण किल्ल्याचे संवर्धन कसे करता येईल, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आम्ही करणार आहोत, असे सावंत यांनी सांगितले.
विजयदुर्ग किल्ल्यातील दुसरी चिलखती तटबंदीचा बाहेरील भाग जमिनीपासून 30 ते 40 फूट भाग मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसात कोसळला. यामुळे आता वरील तटबंदी धोकादायक झाली आहे. तसेच बुधवारी रात्री या दरबार येथील वडाचे झाड किल्ल्याच्या भिंतीवर कोसळल्याने भिंतीचा काही भाग कोसळून ही भिंत कमकुवत झाली आहे. वाढत्या झाडांच्या प्रमाणामुळे अनेक तटबंदीला धोका येणार आहे. या महाकाय झाडांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. पुरातत्व विभागाने याकडे गांभिर्याने लक्ष घालून या किल्ल्याची होत असणारी पडझड थांबविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे सावंत यांनी सांगितले.