प्रतिनिधी / विजयदुर्ग:
विजयदुर्गला लाभलेला ऐतिहासिक किल्ला हा अमूल्य ठेवा असून तो ग्रामस्थांनी जोपासला पाहिजे, असे मत विजयदुर्ग महोत्सवच्या उद्घाटनप्रसंगी शिवसेनेचे नेते संदेश पारकर यांनी व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर कसाल शिक्षण संस्थेचे संचालक अवधूत मालंडकर, विजयदुर्ग सहा. पोलीस निरीक्षक संतोष कोळी, विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाचे नितीन जावकर (मुंबई), यश वेलणकर (अध्यक्ष, ग्रामकमिटी), सरपंच प्रसाद देवधर, उपसरपंच महेश बिडये, शिवसेना दहिसर शाखा प्रमुख नरेंद्र उपरकर, चंद्रकांत बिडये, शैलेश खडपे, संतोष सारंग, संजना आळवे, सचीन खडपे, इतासप्रेमी राजेंद्र परुळेकर, अनिश गोखले, जहीर ठाकुर, गीता लळीत, विजयदुर्ग हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. वाळके आदी उपस्थित होते.
पर्यटनाच्या जोरावर गोवा राज्य प्रगती करत असून पर्यटनामध्ये देशाचे नेतृत्व करत आहे. तशी प्रगती विजयदुर्गची सुद्धा करता येईल. त्यासाठी किल्ल्याचे संवर्धन होणे गरजेचे आहे. देश व विदेशातून येणारा पर्यटक येथे कसा रुळला जाईल, यासाठी आवश्यक त्या उपायोजना केल्या पाहिजेत, असेही पारकर म्हणाले.
814 वर्षे पूर्ण झालेल्या ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्यावर विजयदुर्ग महोत्सव 2019 चे शानदार उद्घाटन झाले. यानिमत्ताने ढोल-ताशांच्या गजरात विजयदुर्ग आगार ते किल्ले विजयदुर्गपर्यंत रॅली काढण्यात आली. यामध्ये परिसरातील शाळांमधील मुले, इतिहास प्रेमी, ग्रामस्थ व पर्यटक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. विजयदुर्ग हायस्कूलचे लेझीम पथक यामध्ये सहभागी झाले होते. सर्वधर्मसमभावचा संदेश देणारा हा विजयदुर्ग महोत्सव सर्वधर्मीय प्रार्थनेने सुरू झाला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या महोत्सवाची सुरुवात झाली. येथीलच कलाकार मंदार तारकर यांनी काढलेले वाळू शिल्प खास आकर्षण म्हणून प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.