रहिवाशांना फटका, दुरुस्तीची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
विजयनगर येथील मराठा कॉलनी नाल्यातील गटार कोसळल्याने पाण्याचा निचरा थांबला आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नाल्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याने हा नाला काही दिवसातच कोसळून दुर्दशा झाले आहे. परिणामी पाण्याचा निचरा थांबल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
लक्ष्मी टेकडी, विनायक मंदिर येथील तलावातील ओव्हरफ्लो झालेले पाणी या नाल्याद्वारे मराठी कॉलनी येते असते. त्यामुळे पावसाळय़ात नाल्याजवळील घरांमध्ये पाणी शिरते. त्यामुळे रहिवाशांना मोठा फटका बसत आहे. शिवाय पावसाळय़ात बाहेर पडणे देखील मुश्किल बनले आहे. याबाबत संबंधित लोकप्रतिनिधी व महानगरपालिका यांच्याकडे कित्येकवेळा निवेदनाद्वारे तक्रार करण्यात आली आहे. मात्र संबंधितांचे याकडे दुर्लक्ष झाल्याने रहिवाशांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या कॉलनीत मागील काही वर्षापासून विकास कामे राबविण्यात येत आहेत. मात्र कोसळल्या गटारीकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे येथील रहिवाशांसाठी ही गटार धोकादायक ठरत आहे. संबंधितांनी तातडीने नाल्याची दुरूस्ती करून गटारीचे बांधकाम करावे, अशी मागणी होत आहे.