शोकसभेत अनेक मान्यवरांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली
प्रतिनिधी/ पणजी, फोंडा
गोव्यासह इतर राज्यातील असंख्य चाहते व हजारो हितचिंतकांच्या उपस्थितीत सौ. विजयाताई श्रीपादभाऊ नाईक यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. आडपई येथील मूळ गावात काल गुरुवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी ‘श्री रामनाथ भवन’ या मूळ निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह भाजपा व अन्य विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, नातेवाईक, संघ परिवारातील कार्यकर्ते, नेते, व हितचिंतकांनी मोठी गर्दी केली होती. विजयाताईंचे प्रेमळ आदरातिथ्य व सहवास यापुढे कधीच लाभणार नाही या विचारानेच अनेकांना आपल्या भावना अनावर झाल्या.
केंद्रीय आयुषमंत्री श्रीपादभाऊ नाईक यांच्या पत्नी सौ. विजयाताई यांचे सोमवार 11 रोजी होसकुंबी – अंकोला, कर्नाटक येथे झालेल्या अपघातात निधन झाले होते. काल गुरुवारी सकाळी फोंडय़ातील आडपई या मूळ गावात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
हजारो लोकांनी सकाळी 7 वा. पासून त्यांच्या जुने गोवे येथील विजयश्री निवासस्थानाबाहेर अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. सकाळी 8 वा. गोमेकॉतून विजयाताईंचे पार्थिव फुलांनी सजविलेल्या वाहनांतून जुने गोवे येथील निवासस्थानी पोहोचले. हजारो लोकांनी अंत्यदर्शन घेतले. यावेळी कर्नाटक राज्याच्या प्रधान सचिव डॉ. शालिनी रजनिश गोयल, पिपल्स फॉरम ऑफ इंडियाचे चेअरमन एस. के. नारायण, कर्नाटक भाजपचे अध्यक्ष नरेंद्रकुमार कट्टी, आंध्रप्रदेश, तेलंगण, महाराष्ट्रचे भाजपा नेते, तसेच सभापती राजेश पाटणेकर, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, आमदार सुभाष शिरोडकर, आमदार दयानंद सोपटे, आमदार एलिना साल्ढणा, जुने गोवे येथील चर्चचे ख्रिस्ती धर्मगुरु, आजी – माजी सरपंच, पंच सदस्य, सरकारी अधिकारी, जिल्हा पंचायत सदस्य, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, केंद्रीय आयुष मंत्रालयातील अधिकारी, सर्व पक्षीय कार्यकर्ते आदींनी विजयाताईंच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. 10.30 वा. पार्थिव जुने गोवेहून आडपई येथील मूळ निवासस्थानी अंतिमसंस्कारासाठी नेण्यात आले.
वाटेत पुष्पवर्षाव करुन वाहिली श्ऱद्धांजली
जुने गोवेहून आडपईपर्यंत अनेक ठिकाणी लोकांनी विजयाताईंच्या पार्थिवावर पुष्पवर्षाव करुन श्रद्धांजली अर्पण केली.
पद्मनाभ शिष्य संप्रदायाकडून सामूहिक प्रार्थना
फुलांनी सजविलेल्या वाहनातून सकाळी 11 वा. त्यांचे पार्थिव शरीर आडपईत आणण्यात आले. अंत्यदर्शनासाठी रस्त्यावर मोठी रांग लागली होती. दुपारी 2.30 वा. घरापासून जवळच असलेल्या कौटुंबिक स्मशानभूमीत अंत्ययात्रा निघाली. ज्येष्ठ चिरंजीव सिद्धेश नाईक यांनी त्यांच्या चितेला मंत्राग्नी दिला. पद्मनाभ शिष्य संप्रदायाच्या अनुयायिंनी सामूहिक प्रार्थना केली.
श्रीपादभाऊंसारख्याच विजयाताई होत्या : मुख्यमंत्री
यावेळी झालेल्या शोकसभेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सुभाष वेलिंगकर व अन्य मान्यवरांनी विजयाताईंच्या स्मृतींना उजाळा देऊन शोकप्रकटन केले. मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, विजयाताई या श्रीपादभाऊ इतक्याच सर्वांसाठी आदरणीय होत्या. त्यांचा प्रेमळ स्वभाव व आपुलकी जपणाऱया स्वभावामुळेच अंत्ययात्रेला हा जनसागर लोटला आहे. घरी येणारी प्रत्येक व्यक्ती व भाजपा कार्यकर्त्यांची त्या आपुलकीच्या नात्याने विचारपूस करीत. श्रीपादभाऊ व त्यांच्या कुटुंबीयांबरोबरच भाजपा परिवारासाठी त्यांची उणीव कायम जाणवणार आहे. श्रीपादभाऊंच्या तब्येतीविषयी बोलताना, त्यात बऱयापैकी सुधारणा होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. गोमेकॉचे डीन डॉ. बांदेकर व अन्य डॉक्टरांचे पथक सातत्याने देखरेख ठेवून आहेत. दिल्लीतील एम्सच्या डॉक्टरांनाही वेळोवेळी अहवाल पाठवला जात आहे. या आघातातून ते लवकरात लवकर बरे होवो व हे दुःख पचवण्याची ताकद त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना लाभो, अशी प्रार्थना त्यांनी केली.
भाऊंच्या जीवनात त्या नसणे ही कल्पनाच करवत नाही ः वेलिंगकर
सुभाष वेलिंगकर म्हणाले, श्रीपादभाऊंच्या अत्यंत खडतर अशा राजकीय प्रवासात विजयावहिनींनी त्यांना खंभिरपणे साथ दिली. त्यांच्या अकाली जाण्याने एकप्रकारची न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे. भाऊंची राजकीय कारकीर्द घडताना आपण जवळून पाहिली व विजयावहिनींचे प्रेमळ आदरातिथ्य व मायाळू स्वभाव अनुभवला. भाऊंच्या जीवनात त्यांचे नसणे ही कल्पनाच धक्कादायक आहे.
गोव्यातील एक आदर्श गृहिणी होत्या – तानावडे
सदानंद तानावडे यांनीही विजयाताईंच्या स्मृतींना उजाळा देताना गृहिणी म्हणून त्या आदर्श होत्या. भाऊंना भेटायला येणाऱया प्रत्येकाचे त्या तेवढय़ाच आपुलकीने आदरातिथ्य करीत. त्यांच्या या प्रेमळ स्वभावामुळेच अनेकांना आपल्या जवळची व्यक्ती गेल्याचे दुःख झाले आहे.
विजयाताई या पद्मनाभ शिष्य संप्रदायाची भक्तीपरंपरा असलेल्या स्व. महानंदू गणसू नाईक यांच्या कन्या होत्या. माहेरचे हे धार्मिक व अध्यात्मिक संस्कार त्यांनी आजन्म जोपासले. त्यांच्या अकाली मृत्युचा आघात पचवण्याची ताकद कुटुंबीयांना मिळो, अशी प्रार्थना पद्मनाभ शिष्य संप्रदायाच्या अनुयायींनी केली.
मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सौ. सुलक्षणा सावंत, उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर व बाबू कवळेकर, बांधकाममंत्री दीपक पाऊसकर, कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे, जलस्रोतमंत्री फिलीप नेरी, नगरविकासमंत्री मिलिंद नाईक, माजी मुख्यमंत्री तथा फोंडय़ाचे आमदार रवी नाईक, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर, म्हापसाचे आमदार जोशुआ फर्नांडिस, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, भाजपाचे संघटनमंत्री सतीश धोंड, गोवा सुरक्षा मंचचे प्राचार्य सुभाष भास्कर वेलिंगकर, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, माजी केंद्रीय मंत्री ऍड. रमाकांत खलप, माजी खासदार ऍड. नरेंद्र सावईकर, माजी सभापती विश्वास सतरकर, माजी आमदार दामोदर नाईक, सिद्धार्थ कुंकळय़ेकर, सुभाष फळदेसाई, किरण कांदोळकर, गणेश गांवकर, धर्मा चोडणकर, वासुदेव मेंग गांवकर, आम आदमी पक्षासह अन्य राजकीय पक्षांचे नेते, जिल्हा पंचायत सदस्य, सरपंच, पंचसदस्य अंत्ययात्रेला उपस्थित होते. कर्नाटक, महाराष्ट्रासह राज्यभरातील राष्ट्रीय स्वयसेवक संघ परिवारातील अनेक संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, याशिवाय विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ व हितचिंतकांनी अंत्ययात्रेला उपस्थिती लावली. परराज्यातील अनेक मान्यवर व चाहत्यांनीही उपस्थिती लावून अंत्यदर्शन घेतले.
श्रीपादभाऊंची अनुपस्थिती सर्वांनाच जाणवली
केंद्रीय आयुषमंत्री श्रीपादभाऊ यांच्या चाळीस वर्षांच्या राजकीय चढउताराच्या प्रवासात व प्रत्येक सुखदुःच्या क्षणी ज्यांनी साथ दिली, त्या आपल्या सहचरणीला अखेरचा निरोप देण्यासाठी भाऊ उपस्थित राहू शकले नाहीत. श्रीपादभाऊंवर सध्या गोमेकॉत उपचार सुरु आहेत. त्यांच्या या अनुपस्थितीमुळे दुःखाची ही सल अंत्ययात्रेला उपस्थित असलेल्या प्रत्येकाला जाणवली. भाऊ शुद्धीवर येईपर्यंत व वहिनींच्या निधनाची माहिती त्यांना दिल्याशिवाय अंत्यसंस्कार करायचे नाहीत, असा निर्णय कुटुंबियांनी घेतला होता. गुरुवारी सकाळी डॉक्टरांच्या उपस्थितीत त्यांना या दुःखद घटनेची कल्पना देण्यात आली. विजयावहिनींची प्रकृती गंभीर होती. त्यांना वाचविण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला, असे डॉक्टरांनी समजावले. त्याही परिस्थितीत भाऊंनी शोक आवरीत हे सत्य स्वीकारले. त्यांच्या हाती चंदनाचे काही तुकडे देऊन पत्नीच्या चितेवर अर्पण करण्यासाठी मुलाने ते स्वीकारले, अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली.