वृत्तसंस्था /जयपूर
शुक्रवारी येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर हिमाचलप्रदेश आणि सेनादल त्याचप्रमाणे सैनी मैदानावर तामीळनाडू आणि सौराष्ट्र यांच्यात विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरीचे सामने खेळविले जाणार आहेत. या सामन्यांना सकाळी 9 वाजता प्रारंभ होईल.
सौराष्ट्र आणि तामीळनाडू हे दोन्ही संघ समतोल असल्याने यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतदार होईल. मात्र दुसऱया उपांत्य सामन्यात हिमाचलप्रदेशचे सेनादलाच्या तुलनेत पारडे किंचित जड वाटते.
या स्पर्धेत सौराष्ट्र आणि तामीळनाडू या दोन्ही संघांनी आपल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात प्रतिस्पर्ध्यांवर मोठा विजय नोंदविला. तामीळनाडूने कर्नाटकाचा 151 धावांनी दणदणीत पराभव केला तर सौराष्ट्र उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत विदर्भचा 7 गडय़ांनी पराभव करत उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. या स्पर्धेत पहिल्यांदाच सेनादलाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. ऋषी धवनच्या नेतृत्वाखाली हिमाचलप्रदेशने उत्तरप्रदेशवर 5 गडय़ांनी विजय मिळवीत शेवटच्या चार संघांत स्थान मिळविले. सौराष्ट्र संघातील जॅक्सन, पी. मंकड आणि ए. वासवदा हे प्रभावी फलंदाज ठरले आहेत. मंकडने या स्पर्धेत आतापर्यंत 339 धावा जमविल्या असून उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात त्याने 77 धावांची खेळी केली हेती. सौराष्ट्रची सलामीची जोडी विश्वराज जडेजा आणि हार्विक देसाई यांना शुक्रवारच्या सामन्यात चांगली फलंदाजी करावी लागेल. समर्थ व्यास आणि चिराज जेनी यांची कामगिरी महत्त्वाची ठरू शकेल. उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात खेळलेल्या सौराष्ट्र संघात उपांत्य फेरीसाठी कोणताही बदल करण्याची शक्यता वाटत नाही. कर्णधार जयदेव उनादकट आणि चेतन साकारिया हे या संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज असून चुडासमा आणि डी. जडेजा हे फिरकी गोलंदाज आहेत.