उत्तर प्रदेशवर 6 गडय़ांनी मात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कर्णधार पृथ्वी शॉची तुफानी फटकेबाजी आणि माजी कर्णधार आदित्य तरेचे नाबाद शतक यांच्या बळावर मुंबईने उत्तर प्रदेशवर 6 गडय़ांनी दणदणीत विजय मिळवित विजय हजारे करंडक राष्ट्रीय वनडे स्पर्धेचे जेतेपद पटकावले. पृथ्वी शॉ या स्पर्धेत 800 हून अधिक धावा जमविणारा पहिला फलंदाज बनला आहे तर शतकवीर आदित्य तरेला सामनावीराचा बहुमान मिळाला.
प्रथम फलंदाजी स्वीकारल्यावर उत्तर प्रदेशने सलामीवीर माधव कौशिकने फटकावलेल्या नाबाद 158 धावामुळे निर्धारित षटकांत 4 बाद 312 अशी भक्कम धावसंख्या उभारली. पण शॉने तुफानी फटकेबाजी करीत त्याची खेळी झाकोळून टाकताना केवळ 39 चेंडूत 10 चौकार, 4 षटकारांची आतषबाजी करीत 73 धावा झोडपल्या. मुंबईने 41.3 षटकांतच 4 बाद 315 धावा जमवित विजय साजरा केला. सलामीचा साथीदार यशस्वी जैस्वालसमवेत (29) शॉने आक्रमक सुरुवात करून देताना केवळ 9.1 षटकांत 89 धावांची भागीदारी केली. त्यापैकी 32 धावा तीन षटकांतच निघाल्या. शॉला 5 धावांवर असताना कर्ण शर्माकडून जीवदान मिळाले होते. त्याचा त्याने पुरेपूर फायदला उठवला. त्याने 30 चेंडूतच अर्धशतक पूर्ण करताना पुलचा षटकार ठोकला. तो आणखी एक शतक नोंदवणार असे वाटत असतानाच शिवम मावीने त्याला बाद केले.
जैस्वाल व तरे यांनी 38 धावांची भर घातल्यानंतर जैस्वाल बाद झाला. अनुभवी तरेने समयोचित शतक पूर्ण करताना 107 चेंडूत नाबाद 118 धावा फटकावल्या. त्याच्या खेळीत 18 चौकारांचा समावेश होता. त्याला शम्स मुलानीकडून (36) चांगली साथ मिळाली. या दोघांनी तिसऱया गडय़ासाठी 88 धावांची भागीदारी केली. 31 व्या षटकात मुलानी बाद झाला, त्यावेळी मुंबईला अद्याप 98 धावांची जरूरी होती. तरेने ओघ कायम ठेवत 33 व्या षटकात दयालला 3 चौकार ठोकले. शिवम दुबेनेही जलद खेळी करताना 28 चेंडूत 6 चौकार, एक षटकारासह 42 धावा फटकावत त्याला पूरक साथ दिली. तरेने 91 चेंडूत शतक पूर्ण केले. त्याचे हे लिस्ट ए मधील पहिलेच शतक आहे. तरे-दुबे यांनीही 88 धावांची भागीदारी करून संघाला विजयासमीप आणले आणि तरेने पॉईंट व शॉर्ट थर्डमॅनच्या मधून बॅककटचा फटका मारत मुंबईचा विजय साकार केला.
माधव कौशिकची विक्रमी खेळी
तत्पूर्वी, माधव कौशिकने नाबाद 158 धावांची खेळी केल्याने उत्तर प्रदेशला 4 बाद 312 धावांची मजल मारता आली. कौशिकने 156 चेंडूत 15 चौकार, 4 षटकार ठोकले. समर्थ सिंगसमवेत त्याने 122 धावांची सलामी दिली होती. समर्थने 73 चेंडूत 4 चौकार, 3 षटकारांसह 55 धावा जमविल्या. कौशिक हा राष्ट्रीय वनडे चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतीत सर्वाधिक वैयक्तिक धावा जमविणारा फलंदाज बनला आहे. याआधी हा विक्रम मयांक अगरवालच्या नावावर होता. त्याने 2014 मध्ये पंजाबविरुद्ध 125 धावा जमविल्या होत्या. संक्षिप्त धावफलक ः उत्तर प्रदेश 50 षटकांत 4 बाद 312 ः माधव कौशिक नाबाद 158 (156 चेंडूत 15 चौकार, 4 षटकार), समर्थ सिंग 55 (73 चेंडूत 4 चौकार, 3 षटकार), अक्षदीप नाथ 55 (40 चेंडूत 4 चौकार, 3 षटकार), प्रियम गर्ग 21, अवांतर 14. गोलंदाजी ः तुषार कोटियन 2-54, प्रशांत सोळंकी 1-71), मुंबई 41.3 षटकांत 4 बाद 315 ः आदित्य