नवी दिल्ली / वृत्तसंस्था
विजय हजारे चषक स्पर्धेतील जेतेपदासाठी आज (रविवार दि. 14) मुंबई-उत्तर प्रदेश यांच्यात अंतिम लढत रंगणार असून यात मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉचा फॉर्म विशेष लक्षवेधी असणार आहे. सकाळी 9 वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
शॉने या स्पर्धेत आतापर्यंत 754 धावांची आतषबाजी केली असून तोच धडाका तो येथील निर्णायक लढतीत देखील कायम राखणार का, याची उत्सुकता असणार आहे. इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेच्या माध्यमातून भारतीय संघात पुनरागमन करण्याचे त्याचे प्रयत्न आहेत.
पृथ्वी शॉने यापूर्वी नाबाद 105, नाबाद 227, नाबाद 185 व 165 धावांची सलग आतषबाजी केली असून रोहित शर्माने वनडे मालिकेतून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला तर शॉचा निश्चितपणाने विचार होऊ शकतो, असे सध्याचे चित्र आहे. अर्थात, 21 वर्षीय शॉने मुख्य प्रवाहातून बाहेर फेकले गेल्यानंतर त्यापासून बराच धडा घेतला असल्याचे या स्पर्धेतून स्पष्ट झाले आहे.
दुसरीकडे, उत्तर प्रदेश संघात एकही स्टार खेळाडू नसला तरी प्रशिक्षक ग्यानेंद्र पांडे व युवा कर्णधार कर्ण शर्मा यांच्या मार्गदर्शनानुसार हा संघ एकजिनसी खेळ साकारण्यात कमालीचा यशस्वी ठरला आहे. उत्तर प्रदेशचा डावखुरा जलद गोलंदाज यश दयाळ हा इनस्विंगर्सवर पृथ्वी शॉला अडचणीत आणू शकणार का, हे आजच्या लढतीत स्पष्ट होईल. मुंबईच्या संघात शॉ याच्याशिवाय, अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज आदित्य तरे, अष्टपैलू शम्स मुलाणी, शिवम दुबे, धवल कुलकर्णी, तुषार देशपांडे यांच्यासारखे अव्वल खेळाडू असल्याने उत्तर प्रदेशचा संघ येथे चमत्कार घडवणार का, याची उत्सुकताही असणार आहे.