आजपासून मुख्य स्पर्धेला सुरुवात, तामिळनाडूसह कर्नाटक, मुंबई दिल्ली जेतपदाचे दावेदार
मुंबई / वृत्तसंस्था
इंग्लंडविरुद्ध मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेच्या पार्श्वभूमीवर, शिखर धवन, श्रेयस अय्यरसारखे अव्वल खेळाडू आजपासून (शनिवार, दि. 19) खेळवल्या जाणाऱया विजय हजारे चषक स्पर्धेत आपले नाणे आणखी एकदा खणखणीत वाजवून दाखवण्यासाठी प्रयत्नशील असतील. 50 षटकांच्या हजारे चषक क्रिकेट स्पर्धेत 5 इलाईट गटातून 24 व 1 प्लेट गटातून 8 संघ सहभागी होत आहेत. बेंगळूर, जयपूर, कोलकाता, सूरत, इंदोर, तामिळनाडून जैवसुरक्षित वातावरणात ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे.
यापूर्वी खांद्याच्या दुखापतीमुळे सईद मुश्ताक अली चषक स्पर्धेत खेळू न शकलेला श्रेयस अय्यर आता पूर्ण तंदुरुस्त असून भुवनेश्वर कुमार व शिखर धवन यांची कामगिरी कशी होईल, याकडेही निवड समितीचे बारीक लक्ष असणार आहे. सईद मुश्ताक अली चषक स्पर्धा जिंकणाऱया तामिळनाडूचा संघ येथेही मजबूत असेल. शिवाय, कर्नाटक, मुंबई, दिल्लीचे संघ आपले नशीब आजमावणार आहेत.
इंग्लंडविरुद्ध वनडे व टी-20 मालिका मार्चमध्ये खेळवली जाणार असून त्यापूर्वी ही स्पर्धा भारतीय खेळाडूंसाठी विशेष महत्त्वाची ठरणार आहे. भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध अहमदाबादमध्ये 5 टी-20 व इंग्लंडविरुद्ध पुण्यात 3 वनडे खेळणार आहे.
यंदाच्या कपात केल्या गेलेल्या स्थानिक हंगामात बीसीसीआयने आयोजित केलेली ही दुसरी प्रथमश्रेणी स्पर्धा आहे. यापूर्वी, सईद मुश्ताक अली चषक ही राष्ट्रीय टी-20 चॅम्पियनशिप यापूर्वी यशस्वीरित्या संपन्न झाली आहे. हजारे चषक स्पर्धेत मुंबई संघात परतणारा कर्णधार श्रेयस अय्यरवर मुख्य लक्ष केंद्रित असेल. मुंबईला माजी ऑफस्पिनर रमेश पोवारच्या रुपाने नवा प्रशिक्षकही लाभला आहे. श्रेयस अय्यरबरोबरच सुर्यकुमार यादव देखील येथे प्रभावी खेळ साकारण्यासाठी महत्त्वाकांक्षी असेल.
सध्या मुख्य प्रवाहातून बाहेर फेकल्या गेलेल्या पृथ्वी शॉला सुद्धा आपला फॉर्म दाखवून देण्यासाठी ही स्पर्धा महत्त्वाचे माध्यम असणार आहे. यापूर्वी, मुंबईला सईद मुश्ताक अली स्पर्धेत अपयश पत्करावे लागले. पाँडिचेरीविरुद्ध पराभव पत्करल्यानंतर त्यांचे स्पर्धेतील आव्हानही साखळी फेरीतच संपुष्टात आले होते.
मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार उत्तर प्रदेशचे नेतृत्व करणार असून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील स्पेशालिस्ट शिखर धवन येथे महत्त्वाकांक्षेने मैदानात उतरेल, हे निश्चित आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने शेवटचे आंतरराष्ट्रीय प्रतिनिधीत्व केले आहे. येथे तो प्रदीप संगवानच्या नेतृत्वाखाली दिल्लीतर्फे खेळणार आहे.
मुश्ताक अली स्पर्धा गाजवणारा बडोद्याचा संघ आता कर्णधार, अष्टपैलू कृणाल पंडय़ाच्या पुनरागमनामुळे आणखी मजबूत असेल. यापूर्वी, वडिलांचे निधन झाल्याने कृणालला मुश्ताक अली स्पर्धा अर्ध्यावरच सोडून द्यावी लागली होती. विजय हजारे चषक स्पर्धेत तामिळनाडूचे नेतृत्व दिनेश कार्तिककडे असेल. मात्र, युवा सनसनाटी जलद गोलंदाज टी. नटराजन येथे बीसीसीआयच्या विनंतीमुळे या स्पर्धेत खेळू शकणार नाही. इंग्लंडविरुद्ध मालिकेत ताजेतवाने असावा, यासाठी त्याला संघातून मुक्त करण्याची विनंती यापूर्वी बीसीसीआयने तामिळनाडू संघटनेला केली होती. बंगालचा अनुभवी खेळाडू मनोज तिवारी यंदा उपलब्ध नसेल. त्याच्या गैरहजेरीत अनुश्टुप मजूमदारकडे संघाच्या नेतृत्वाची धुरा असणार आहे.
गटनिहाय संघ
अ गट ः गुजरात, छत्तीसगढ, हैदराबाद, त्रिपुरा, बडोदा, गोवा (सामने सूरतमध्ये).
ब गट ः तामिळनाडू, पंजाब, झारखंड, मध्य प्रदेश, विदर्भ, आंध्र (सामने इंदोरमध्ये).
क गट ः कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ, ओडिशा, रेल्वे, बिहार (सामने बेंगळूरमध्ये).
ड गट ः दिल्ली, मुंबई, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, राजस्थान, पाँडिचेरी (सामने जयपूरमध्ये).
ई गट ः बंगाल, सेवादल, जम्मू आणि काश्मीर, सौराष्ट्र, हरियाणा, चंदिगढ (सामने कोलकातामध्ये).
प्लेट गट ः उत्तराखंड, आसाम, नागालँड, मेघालय, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, सिक्कीम (तामिळनाडू).