उत्तर भारतात 70 हून अधिक जणांचा मृत्यू
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
उत्तर भारतात सर्वदूर पाऊस कोसळत असून विविध राज्यांमध्ये वेगवेगळय़ा दुर्घटनांनी हाहाकार माजवला आहे. राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश या राज्यांमध्ये वीज पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून आहे. या आपत्तीमध्ये तब्बल 70 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून 200 हून अधिक जनावरेही दगावली आहेत. तर, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये धुवाँधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या असून त्यातही जीवितहानी झाल्याचे वृत्त आहे. तसेच बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या राज्यांमध्ये दमदार पावसामुळे बऱयाच भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे.
उत्तर भारतात रविवारपासून प्रचंड पाऊस कोसळत आहे. पावसासोबत विजांचा कडकडाटही होत होता. बऱयाच ठिकाणी वीज पडून नागरिक मृत्युमुखी पडले. एकटय़ा उत्तर प्रदेशमध्ये सर्वात जास्त म्हणजे 41 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील सर्वाधिक मृत्यू प्रयागराज येथे झाले असून या घटनांतील मृत्यू पावलेल्यांची संख्या 14 इतकी आहे. तसेच कानपूरमधील देहात आणि फतेहपूर येथे प्रत्येकी पाच, कौशांबी येथे चार, फिरोजाबाद येथे 3, उन्नाव-हमीरपूर-सोनभद्र येथे प्रत्येकी दोन, तर कानपूर नगर-प्रतापगढ-हरदोई-मिर्झापूर येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.
उत्तर प्रदेशात वीज कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये अनेक पाळीव आणि जंगली प्राणीही ठार झाल्याचे समजते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनेची दखल घेतली असून दुःखही व्यक्त केले आहे. त्यासोबत जिल्हा प्रशासनास दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना सरकारी नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
मध्यप्रदेशात 7 जणांचा मृत्यू
मध्यप्रदेशातही वीज पडून 7 जणांचा मृत्यू झाला आहे. यात श्योपूर आणि ग्वाल्हेर येथे प्रत्येकी 2 तर शिवपुरी, अनुपपूर, बैतुल येथे प्रत्येकी एक जण दगावला आहे. अशाच प्रकारच्या दुर्घटना जम्मू-काश्मीरमध्येही घडल्या आहेत. तसेच पूरस्थितीमुळे बिहारमधील 14 जिल्हय़ांमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून पूरप्रवण क्षेत्रातील लोकांना सुरक्षितस्थळी हलविले जात आहे.
राजस्थानमध्येही हाहाकार
वॉच टॉवरवर वीज कोसळल्याने मोठी जीवितहानी
राजस्थानमध्येही वीज पडून 20 जणांचा मृत्यू झाल्याचा अधिकृत आकडा जाहीर करण्यात आला आहे. तथापि, हा आकडा मोठा असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासकीय पातळीवरून प्राप्त आकडेवारीनुसार जयपूरमध्ये 11, धौलपूरमध्ये 3, कोटा येथे 4, झालावाड आणि बारा येथे 1 असे लोक दगावले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना राजस्थान सरकारतर्फे 5 लाखांच्या भरपाईची घोषणा करण्यात आली आहे. जयपूरमधील आमेर भागातील टेकडीवर बांधलेल्या वॉच टॉवरवर वीज कोसळल्याने 11 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास वॉच टॉवरवर वीज कोसळली. वीज कोसळल्यानंतर पर्यटकांनी धावपळ करताच चेंगराचेंगरीही झाली. या धावपळीत काही लोक टेकडीवरून खाली कोसळल्याची भीती व्यक्त होत आहे. प्रथमच काही जणांना विजेचा झटका बसल्यानंतर काही जण बेशुद्ध झाले. तर काहीजण घाबरून मृत्युमुखी पडले. एकंदर या दुर्घटनेत 30 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
धरमशाला येथे ढगफुटीमुळे हाहाकार
हिमाचल प्रदेशातील धरमशाला येथे ढगफुटीसदृश पाऊस कोसळल्याने हाहाकार माजला आहे. धरमशाला येथील भागसू भागात अचानक पूर आल्यामुळे वाहनांचे आणि घरांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. भागसू हे ठिकाण पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. ढगफुटी झाल्याने अनेक पर्यटक घटनास्थळी अडकून पडले आहेत. ढगफुटीमुळे आलेल्या पुराच्या पाण्यात अनेकांच्या गाडय़ा वाहून गेल्या आहेत. नाल्याचे पाणी घरे आणि हॉटेल्समध्ये घुसल्यामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. आपत्ती निवारण विभागाला या घटनेची माहिती देण्यात आली आहे.
पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी व्यक्त केले दुःख
वीज कोसळून काही नागरिक ठार झाल्याची माहिती कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून दुःख व्यक्त केले आहे. ‘वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत काही नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ही अत्यंत दुःखद घटना आहे. मी मृतांच्या परिवाराप्रती गंभीर संवेदना व्यक्त करतो’ असे ट्विट पंतप्रधानांनी केले आहे. तसेच हिमाचलमधील दरड कोसळण्याच्या दुर्घटनेबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दुःख व्यक्त केले आहे.