वार्ताहर/ विजापूर
माहेरहून हुंडा आणला नाही म्हणून 14 मे रोजी आपल्या मुलीला घातक गोळय़ा देऊन खून केल्याची तक्रार विवाहितेच्या आई-वडिलांनी जलनगर पोलिसात केली आहे. निखत कौसर (वय 30) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी जलनगर पोलिसांनी पती रियाज अहमद व सासू बानूबी यांना अटक केली आहे.
याबाबतची माहिती अशी की, येथील सरकारी इस्पितळातील पारिचारिका निखत कौसर हिचा विवाह रियाज अहमद याच्याशी झाला होता. आठ महिन्यापूर्वी तिने एका बालकाला जन्म दिला होता. लग्न झाल्यापासून तिचा पती, सासू, नणंद यांनी तिला त्रास देण्यास सुरूवात केली होती. माहेरून पैसे व कारगाडी घेऊन ये असा तगादा तिच्याकडे लावला होता. पण तिच्या माहेरची मंडळी इतक्या महागडय़ा वस्तू देण्यास असमर्थ होत्या. पण सासरच्याकडून पैसे व कारगाडीसाठी तगादा सुरू होता. निखतने 14 मे रोजी माहेरहून पैसे आणण्यास नकार दिल्याने चिडलेल्या पती रियाज अहमद, सासू बानूबी, दीर निसार अहमद, नणंद नहेदा यांनी निखतचे हातपाय धरून तिला जबरदस्तीने घातक गोळय़ा देऊन तिचा खून केला, अशी तक्रार तिच्या आईने पोलिसांकडे केली आहे.
याप्रकरणी जलनगर पोलिसांनी गुन्हा नोंद करून पती रियाज अहमद व सासू बानूबी यांना अटक केली आहे तर दीर व नणंद फरारी झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे एकच हळहळ व्यक्त होत आहे.