14 महाविद्यालयातील 700 विद्यार्थ्यांनी दिली विद्यापीटाला भेट
प्रतिनिधी / कोल्हापूर
केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या ’स्तुति’ या उपक्रमांतर्गत, शिवाजी विद्यापीठातील एसएआयएफ-डीएसटी केंद्रद्वारा आयोजित, ’विज्ञान जागृती सप्ताह’ 22 ते 28 फेब्रुवारी दरम्यान शिवाजी विद्यापीठामध्ये यशस्वीरित्या पार पडला. कोल्हापूर, सांगली, सातारा व बेळगाव या विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील दररोज दोन कॉलेज अशा 14 महाविद्यालयातील 700 विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.
शिवाजी विद्यापीठातील विज्ञान शाखेकडून मिळालेल्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी पार पाडला. स्तुती उपक्रमाचे नियोजन शिवाजी विद्यापीठातील समन्वयक डॉ. आर. जी. सोनकवडे यांनी केले. या उपक्रमाला विज्ञान शाखेतील विविध विभागांचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी व इतर कर्मचाऱयांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले. विज्ञान सप्ताहामध्ये अतिशय मैलवान माहिती मिळाल्याचे महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांची सांगितले. या भेटीमुळे विद्यार्थ्यांना संशोधनाची गोडी निर्माण होईल, अशा भावनाही शिक्षकांनी व्यक्त केल्या. प्रत्येक विद्यार्थ्यांना शब्दकोश, कंपास, वही व पेन यांसारखे शैक्षणिक साहित्य भेट स्वरूपात दिले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील व सर्व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टीकोन अन नीतिमूल्यांचे आचरण करण्याचा सल्ला दिला. विद्यार्थ्यांना कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के आणि ’स्तुती’ उपक्रमाचे समन्वयक डॉ. आर. जी. सोनकवडे यांच्या सहीचे सहभाग प्रमाणपत्र दिले.
विद्यापीठात झालेल्या विज्ञान सोहळय़ात आलेल्या विद्यार्थ्यांपैकी किमान दोन टक्के विद्यार्थी संशोधक बनतील. येथील सर्व अधिविभागांना भेटी दिल्याने त्यांना विज्ञानाची गोडी निर्माण होईल. त्यामुळे या उपक्रमाच्या आयोजनाचा हेतू साध्य होईल.- डॉ. आर. जी. सोनकवडे (समन्वयक एसएआयएफ-डीएसटी केंद्र, शिवाजी विद्यापीठ)