विट्यातील स्वच्छता करून कर्मचाऱ्यांची पूरग्रस्त भागांत सेवा
प्रतिनिधी / विटा
स्वच्छ शहर अभियानात विटा शहराने देशात नावलौकिक मिळवला आहे. स्वच्छतेत देशात अव्वल असणाऱ्या विट्यातील सफाई कर्मचार्यांनी आता पूरग्रस्त भागातील गावांची स्वच्छता करण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. विशेष म्हणजे शहराची स्वच्छता करून मग हे पथक पूरग्रस्त भागासाठी योगदान देत आहे. नगरपालिका आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचे त्यामुळेच पूरग्रस्त भागातही कौतुक होत आहे.
विटा नगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देशातील अव्वल नगरपालिका पैकी एक आहे. कचरा कुंडीमुक्त गाव, स्वच्छ शहर, कचऱ्यावर प्रक्रिया करणारे शहर असा नावलौकिक मिळवणाऱ्या शहराने खताचा हरित ब्रँड केला आहे. आता याच शहराने जिल्ह्यावर आलेल्या संकटात मदतीसाठी धाव घेऊन वेगळाच आदर्श निर्माण केला आहे.
देशात कोरोना सारखे महाभयांकर संकट चालू असतानाच राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कोकणला महापुराच्या संकटाने विळख्यात अडकवले आहे. अशा परिस्थतीमध्ये एक हात मदतीचा पुढे करीत विटा नगर परिषदेने पूरग्रस्त भागात सामाजिक सेवा म्हणून पुढाकार घेतला आहे. नगरपरिषदेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त गावामध्ये आरोग्य विभागाकडून स्वच्छता करण्यासाठी वाहने, सफाई कर्मचारी, पिण्यासाठी व स्वच्छतेसाठी पाणी टॅंकर यांचा पुरवठा करण्यात आला आहे. अहोरात्र नगरपरिषदचे कर्मचारी स्वच्छता करण्यासाठी आमनापुर आणि आसपासच्या गावात काम करत आहेत. शहर स्वच्छतेची महत्वाची जबाबदारी पार पडून पुन्हा सामाजिक जाणिवेतून हे काम केले जात आहे.
विटा नगरपरिषदच्या नगराध्यक्षा प्रतिभाताई पाटील, मुख्याधिकरी अतुल पाटील आणि स्वच्छतेचे ब्रँड अंबेसीटर माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्यासह नगरसेवकांनी पुढाकार घेत यासाठी नगरपालिका पथके रवाना केली आहेत.
विशेष म्हणजे पूरग्रस्त भागात काम करीत असताना विट्यातील शहर स्वच्छतेची जबाबदारी देखिल पार पाडली जात आहे. नगर परिषदेचे सफाई कामगार देत असलेल्या योगदानाबद्दल पूरग्रस्त भागातून समाधान व्यक्त होत आहे.