प्रतिनिधी / विटा
विटा शहरातील समाधान खडसे उर्फ स्वामी या तरुणाच्या कथीत अपहरण करणाऱ्याचा अखेर छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून स्वामी याने हा बनाव केल्याचे उघडकीस आले आहे. स्वामी यास पुण्याहून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नैराश्येपोटी हा प्रकार स्वामी याने केल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान अपहरण घातपात का आत्महत्त्या ? या तिन्ही संशयामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. परंतु अखेरीस हा बनाव असल्याचे निष्पन्न झाले आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, समाधान महेंद्र खडसे उर्फ स्वामी याचे नागेवाडी हद्दीतील ओढ्याच्या पुलावरून अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केल्याची फिर्याद समाधान यांचा मावस भाऊ मोरेश्वर भागेद्र कपाळे यांनी विटा पोलिसांत दिली होती. त्यानुसार विटा पोलिसांची पथके समाधानचा शोध घेत होती. अपहरण झालेल्या ठिकाणी त्याची मोटरसायकल, टीशर्ट, जर्कीन, फुट अवस्थेतील मोबाईल, चप्पल, इतर कागदपत्रे मिळून आली. परंतु घटनास्थळी मारहाणीचा पुरावा अथवा रक्ताचे डाग नसल्यामुळे हा घातपात नसावा, असा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी बांधलाच होता. परंतु अन्य काही प्रकार असावा का, या दृष्टीने तपास सुरू झाला. त्यातूनच मित्रमंडळी, पुर्ववैमनस्य असणारी मंडळी, नातेवाईक यांच्याकडे तपास सुरू केला.
दरम्यान, समाधान हा कराड मार्गे नाशिक आणि तेथून पुणे येथे आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यादृष्टीने तपास करून समाधानचा शोध घेतला असता तो पुणे येथे मिळून आला. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने घटनास्थळी स्वतः बनाव करून निघुन गेला असल्याचे पोलिसांना सांगितले. परंतु या कृत्यामागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. हा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी पद्मा कदम, पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय शेडगे, पोलिस नाईक अमर सुर्यवंशी, हणमंत लोहार, सुरेश भोसले, शशिकांत माळी, नवनाथ देवकुते, पुंडलिक कुंभार, सागर निकम, अक्षय जगदाळे, रोहित पाटील, सायबर विभागाचे कॅप्टन गुंडवडे, प्रकाश पाटील यांच्या पथकाने केला.