प्रतिनिधी / विटा
लॉकडाऊन अडकलेल्या प्रत्येकाला गावाची ओढ लागली आहे. गावी जाण्यासाठी येनकेन प्रकारे प्रयत्न सुरू असतात. अनेक प्रयत्नानंतर गावी जाण्याचा परवाना मिळाल्याचा निरोप येतो पण दुर्दैव आडवे येते. परवाना मिळाल्याचा निरोप मित्राला सांगण्यासाठी धावत जाणाऱ्या कामगाराला रस्त्यातच चक्कर येते आणि दवाखान्यात जाण्यापूर्वी त्यांची प्राणज्योत मालवते. या दुर्दैवी घटनेने आज विटेकर उद्योग जगताच्या आणि परिसरातील लोकांच्या डोळ्यात पाणी उभा राहील.
उत्तरप्रदेश येथील अनेक हातमाग कामगार विट्यात कामाला आहेत. लॉकडाउनमुळे असेच काम करणारे राम सखा (55, रा. अर्जुनपाठक, जि. मिर्जापुर, उत्तरप्रदेश) हे विट्यात अडकून पडले होते. त्यांचे कुटुंबीय उत्तरप्रदेश येथे आहे. गावी जाण्यासाठी त्यांचा अनेक दिवसापासून प्रयत्न सुरू होता. परंतु परवानगी मिळत नव्हती. त्यांनी गेल्या आठवड्यात येथील तहसील कार्यालयात ऑनलाईन पास मिळण्यासाठी अर्ज केला होता.
गुरुवारी सकाळी त्यांना येथील तहसील कार्यालयातून दूरध्वनी वरून परवानगी मिळाल्याचा निरोप मिळाला. गावाकडे जाण्याची व्यवस्था झाली असून तुम्ही उद्या सकाळी १० वाजता विटा बसस्थानकात या. मिरजसाठी एसटी आहे. मिरजेतून उत्तरप्रदेशकडे जाण्यासाठी ट्रेनची सोय आहे. त्यात तुमचे तिकीट आहे, असा निरोप ऐकल्यावर राम सखा याना खूप आनंद झाला. येथील मुंढेमाळ्यातील परिसरात राहणाऱ्या मित्राला ही आनंदवार्ता सांगण्यासाठी ते पळतच सुटले. वाटेत ते चक्कर येऊन पडले. येथील विवेक भिंगारदेवे यांनी त्यांना तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु दरम्यानच्या काळात त्यांची प्राणज्योत मालवली. उपचार घेण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरनी जाहीर केले.