खून करून आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न, आरोपी अटकेत
दिघंची/प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यातील विठलापूर येथील काजल देवानंद काळेल या विवाहितेचा पुणे येथे गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.18 मार्च रोजी ही घटना घडली असून मयतेचे पती देवानंद मछिंद्र काळेल (रा.वळई,तालुका – माण, जिल्हा सातारा) याच्यावर गुन्हा दाखल झाला असून सदर संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.
याबाबत मुलीचे वडील मारुती पितांबर बाड (रा.विठलापूर,तालुका -आटपाडी,जिल्हा सांगली) यांनी फिर्याद दिली आहे.फिर्यादित म्हटले आहे की काजल देवानंद काळेल हिचा विवाह जुलै 2021 सली देवानंद मछिंद्र काळेल (मूळ राहणार – वळई, ता. माण, जि. सातारा) याच्याबरोबर झाला होता परंतु गेली चार महिन्यापासून सदर जोडपे पुणे येथील आंबेगाव बुद्रुक परिसरात रहायला आले होते. याठिकाणी नवरा देवानंद यांच्या कडून दारू पिऊन वारंवार मुलीला मारहाण होत होती. याबाबत 18 मार्च 2022 रोजी देवानंद काळेल याने काजल हिने गळफास घेतली असून मी तिला उपचारासाठी दवाखान्यात नेत आहे असे फोन करून मारुती बाड यांना सांगितले.परंतु याबाबत मारुती बाड यांनी पोलीस ठाण्यात ही आत्महत्या नसून काजल च्या पातिनेच तिचा गळा दाबून खून केल्याची तक्रार दिली. अखेर पितांबर बाड यांच्या फिर्यादी नंतर देवानंद काळेल याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. लग्न झाल्यानंतर अवघ्या आठ महिन्यातच काजल काळेल हिचा संसार उध्वस्त झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.