मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडे
प्रतिनिधी/ पंढरपूर
अगदी काही वेळांसाठी टाळ-मृदुंगाचा गजर. अन संपूर्ण दिवसभर चंद्रभागेच्या तिरावर निरव शांतता. अशा परिस्थितीत पंढरपूर शहरात आषाढी एकादशीचा सोहळा रंगला गेला. एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘महाराष्ट्र कोरोनामुक्त होऊ दे…माझ्या बळीराजाला सुख, समाधान आणि भरभराट येऊ दे..’ असे विठुमाऊलीच्या चरणी साकडे घातले आहे.
मुख्यमंत्री ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची बुधवारी पहाटे आषाढी एकादशीनिमित्त महापूजा करण्यात आली. त्यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री ठाकरे यांचा सपत्नीक सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे उपस्थित होते.
श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा पहाटे दोन वाजता सुरू झाली. आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा मानाचे वारकरी अहमदनगर जिह्यातील वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बढे आणि अनुसया बढे (मु. चिंचपूर-पांगुळ, ता. पाथर्डी) या दाम्पत्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी केली.
सकाळी आठच्या सुमारास संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत सोपानकाका, संत मुक्ताई, संत निवृत्तीनाथ, संत एकनाथ, संत निळोबाराय अशा सर्वच मानांच्या संतांच्या पादुका नगरप्रदक्षिणेसाठी निघाल्या. प्रसंगी शहरातील महाराज मंडळी आणि नागरिकही प्रदक्षिणेसाठी बाहेर पडले. दरम्यान नगर प्रदक्षिणेवेळेस चंद्रभागेचे स्नानही पादुकांना घालण्यात आले. अकरा वाजता खासगीवाल्यांचा राहीरखुमाईसह पांडुरंगाचा असणारा रथोत्सव प्रतिकात्मक पद्धतीने ट्रक्टरमधून निघाला. अन् एकादशीचे धार्मिक कार्यक्रम संपुष्टात आले.
…..केवळ प्रतिकात्मकच शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची यंदाची पहिलीच आषाढीची महापूजा होती. मात्र कोरोनामुळे मुख्यमंत्र्यांना शासकीय महापूजा प्रतिकात्मक पद्धतीने करता आली. प्रतिवर्षी राज्याचे मुख्यमंत्री विठोबाच्या मूर्तीस दुग्धाभिषेक घालतात. यंदा मात्र मुख्यमंत्री ठाकरे यांना मूर्तीस स्पर्शही करता आला नाही. त्यामुळे यंदाची महापूजा केवळ प्रतिकात्मक शासकीय महापूजा ठरली.