ठिकठिकाणी खड्डय़ांचे साम्राज्य, अपघातांची मालिका सुरूच, जीवावर बेतण्यापूर्वी डागडुजीची मागणी
प्रतिनिधी /डिचोली
कारापूर तिस्क येथून सांखळीत प्रवेश करताना वाहन चालकांना विशेषतः दुचाकी चालकांवर जीव मुठीत धरून प्रवास करण्याची वेळ सध्या आली आहे. विठ्ठलापूर ते दत्तवाडी या दरम्यानचा रस्ता सध्या मृत्यूचा सापळा बनला असून या खड्डेमय धोकादायक रस्त्यावर छोटे मोठे अपघात सुरूच आहेत.
सांखळीत प्रवेश करताना वाळवंटी नदीवरील पूल हा पोर्तुगीजकालीन आहे. त्यावर अवजड वाहने येताजाता पुलाचे कंपन होते. पुलाच्या दुतर्फा खड्डे पडले आहेत. पुलावरील खड्डे चुकविताना वाहन चालकांना कसरत करावी लागते. यामध्ये गंभीर अपघात घडण्याची भीती असते. अपघात टाळण्यासाठी यावर साबांखाच्या तज्ञ अभियंत्यानी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे.
गतिरोधकांवर चाळण
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाजवळील गतिरोधकावरील हॉटमिक्स डांबर पूर्णपणे उखडल्यामुळे याठिकाणी चाळण झाली आहे. गतिरोधकावरील डांबर पूर्णपणे उखडले आहे.
जलवाहिनी फुटल्याने रस्ता बनला खड्डेमय
रास्त्याखालच्या जलवाहिनी फुटल्या आहेत. याकडे पावसात सांबाखाने दुर्लक्ष केले. पावसाळय़ात रस्ते फोडण्यास कायद्याने मंजुरी नसल्याने हे काम रखडले. नेमका उतरणीवरच हा भला मोठा खड्ड निर्माण झाल्याने वाहनचालकांना धोका पत्करून वाहने हाकावी लागतात. याकडे लवकरात लवकर लक्ष घालण्याची मागणी बाबुराव नाईक यांनी केली आहे.
खड्डमुळे अपघातांना आमंत्रण
कारापूर तिस्क -सांखळी रस्त्यावर धोकादायक वळणावर नाईक कुटुंबियांच्या घरावर अनेनवेळा अवजड वाहने धडकून नुकसान होण्याच्या घटना घडल्या आहेत. याच ठिकाणी गेल्या गणेश चतुर्थीच्या आदल्याच दिवशी एक ट्रक कोसळून नाईक कुटुंबियांच्या घराला धडकला होता. यामुळे वळणावरच पडलेला खड्डा अपघातांना आमंत्रण देत आहे. यामुळे अपघातांच्या घटना घडल्या आहेत.
त्रिपुरारी पौर्णिमेपूर्वी रस्त्याची डागडुजी करा!
विठ्ठलापूर सांखळी येथे यावषी दोन वर्षांच्या खंडानंतर राज्यस्तरीय त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव व नौकानयन स्पर्धा होणार आहे. या सोहळय़ासाठी साखळीत लोकांची मोठी गर्दी उसळण्याची शक्मयता आहेच. यासाठी सदर रस्त्यावरील खड्डे पूर्णपणे बुजवून रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी वाहनचालक, सांखळी विठ्ठलापूर भागातील जागरूक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
खड्डय़ांचे पॅचवर्क करा : ज्ञानेश्वर बाले
या मुख्य रस्त्यावरील तसेच अंतर्गत भागातील रस्त्यांवर पडलेले खड्डे त्वरित बुजविण्याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ता विभागाला पत्र लिहिण्यात आले आहे. या खड्डयांची गंभीर दखलही बांधकाम खात्याने घेतली असून ते बुजविण्याचे काम लवकरच हाती घेतले जाणार असल्याचे स्थानिक पंचसदस्य ज्ञानेश्वर बाले यांनी सांगितले.