आज सहावा दिवस, दरदिवशी बनते 70 किलो चण्याची उसळ, उत्सवाला 150 वर्षांची परंपरा
वार्ताहर /पर्ये
सुमारे 150 वर्षांची परंपरा असलेला सांखळी विठ्ठलापूर येथील श्री पांडुरंग देवस्थानाकडचा ब्रह्मदेव मंदिरासमोरच ‘उसळ उत्सव’ दरवषी लोकप्रिय होत असून या उसळ उत्सवात सहभागी होऊन उसळ खाण्यासाठी अनेक भाविक याठिकाणी येत असतात. दहा दिवस चालणाऱया या उत्सवात दर दिवशी 70 किलो चण्याची उसळ करून भाविकांना वाटण्यात येते.
याबद्दल येथे उपस्थित तिसऱया दिवसाचे उसळीची मानकरी मांगिरीश रामराय दुभाषी,दहाव्या दिवसाच्या उसळीचे मानकरी व उसळ बनविणारे श्यामसुंदर भिडे यांच्याकडून मिळालेली माहिती अशी कि, सुमारे दीडशे वर्षांपूर्वी या परिसरात चोऱया होत असत व या चोरीपासून रक्षण करावे म्हणून येथील जागृत ब्रह्मदेवाला गाऱहाणे घातले जाते व ब्रह्मदेव रक्षण करत असल्याने त्यांना उसळीचा नैवद्य दाखविला जायचा.
सुरुवातीला ही उसळ 50 किलो चण्यांपासून केली जायची. ही उसळ करण्यासाठी ब्रह्मदेवाच्या मंदिरासमोर होळीच्या ठिकाणी चूल करून ही उसळ बनविण्यात येते. ही दहा दिवसांची उसळ बनविण्यासाठी होळीचे लाकूड वापरले जाते. पांडुरंगाची होळी व भवानीची होळी येथे वापरतात. सोबत इतरही लाकडे वापरली जातात. होळीची लाकडे दहाही दिवसांसाठी वापरली जातात.
शिमगोत्सवाच्या दुसऱया दिवसापासून या उसळीला सुरुवात होते.उसळ बनविण्याची तयारी पांडुरंग देवस्थानासमोरच करतात. गेल्या 13 वर्षांपासून श्यामसुंदर भिडे हे उसळ बनवितात. रात्री 11 वा. उसळ वाटप सुरू होते. उसळ वाटण्यापूर्वी भाविकांना मोठय़ाने हाक देऊन बोलावितात. सुमारे 800 ते 1000 भाविकांना शिस्तबद्ध रांगेत यावेळी द्रोणातून उसळ वितरित केली जाते.
पहिल्या दिवशी विठ्ठलापूर दहाजण शिमगोत्सव मंडळ, दुसऱया दिवशी प्रतापसिंह राणे सरदेसाई, तिसऱया दिवशी मांगिरीश रामराय दुभाषी, चौथ्या दिवशी नाडकर्णी कुटुंबीय, पाचव्या दिवशी शेंदुरें कुटुंबीय, सहाव्या दिवशी शेखर गोपीनाथ नाईक सांखळकर कुटुंबीय, सातव्या दिवशी भक्तमंडळ, आठव्या दिवशी नितीन साखरदांडे, नवव्या दिवशी प्रकाश व प्रफुल्ल हेदे व दहाव्या दिवशी अनंत मणेरीकर यांच्यातर्फे उसळ देण्यात येते. शेवटच्या दिवशी दशमीला गाऱहाणे घालून सांगता करण्यात येते.