प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊनच्या संकटात सापडलेल्या विणकर बांधवांना राज्य सरकारने काहीसा दिलासा दिला आहे. विणकर उद्योगाशी संबंधित घेतलेल्या 1 लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विविध सहकारी बँक आणि सहकारी संघांतून कर्ज घेतलेल्या विणकर बांधवांना याचा लाभ मिळणार आहे.
राज्यात गेल्या चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तर मागीलवर्षी अतिवृष्टीमुळे नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. यंदा लॉकडाऊन परिस्थितीमुळे विणकर बांधवांचे जीवन हालाखीचे बनले आहे. यामुळे वस्त्रोद्योग क्षेत्राला उर्जितावस्था आणण्यासाठी सरकारच्यावतीने कर्ज माफीचा निर्णय घेण्यात आला आहे. आपल्या उद्योगाशी संबंधित घेतलेले 1 लाखापर्यंतचे विणकरांचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. यासाठी दि. 26 जुलै 2012 पासून कर्ज घेतलेल्या आणि 31 मार्च 2019 पर्यंत (आऊट स्टँडिंग) 1 लाखापर्यंतचे कर्ज आणि त्यावरील व्याज पूर्णपणे माफ करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
विणकर सहकारी संघ, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, नगर सहकारी बँक, विविधोद्देशीय सहकारी संघ, सौहार्द सहकारी बँक, कृषीयेत्तर पत्तीन सहकारी संघ आणि अन्य सहकारी बँकांतून कर्ज घेतलेल्या विणकरांना कर्ज माफीचा लाभ मिळणार आहे. अनेक संकटांचा सामना करून उद्योग सुरू ठेवलेल्या विणकरांना सध्या कोविड-19 च्या लॉकडाऊनचा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत कर्ज घेतलेल्या विणकरांवर भार पडू नये, या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी वस्त्राsद्योग कार्यालयाशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.