देशातील उच्चशिक्षित तरुण अमेरिका व इतर प्रगत युरोपियन देशांमध्ये नोकरीसाठी जाण्याची धडपड करताना दिसतात. तथापि, उत्तर प्रदेशातील मोदीनगर येथील रहिवासी रजनीशकुमार यांनी काही वर्षांपूर्वी परदेशातील लाखो रुपये पगाराची नोकरी सोडून ‘गाववापसी’ केली. आता त्यांनी गावात मत्स्यपालनाचा व्यवसाय थाटून तो भरभराटीला आणून दाखविला आहे.
रजनीशकुमार यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर बरीच वर्षे इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व ब्राझील इत्यादी देशांमध्ये मोठ्या वेतनाच्या नोकऱ्या केल्या. इंग्लंडमध्ये त्यांचे पॅकेज 30 लाख रुपयांचे होते. तथापि, जन्मगावाची ओढ त्यांना स्वस्थ बसू देईना. आपल्या गावी परतून उद्योगधंदा सुरू करून इतरांनाही प्रेरणा द्यावी, या विचाराने त्यांना घेरले आणि त्यांनी भक्कम वेतनाची इंग्लंडमधील नोकरी सोडून गावची वाट धरली. त्यांनी मत्स्यपालन करण्याचा निर्णय घेतला. खरेतर त्यांच्या गावात पाण्याची टंचाई आहे. तरीही हा निर्णय घेणे धाडसाचेच होते. तथापि, हा व्यवसाय त्यांनी भरभराटीला आणून दाखविला आहे. त्याच्या जोडीला मत्स्यपालनाचे शिक्षण केंद्रही सुरू केले आहे. आजपर्यंत शेकडो होतकरू तरुणांना त्यांनी मत्स्यपालनाच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या नव्या संधींशी त्यांचा परिचय करून दिला आहे. 2018 मध्ये 12 एकर भूमीत सुरू केलेला हा क्यवसाय आता काही कोटींवर जाऊन पोहोचला आहे.