5.52 लाख जणांनी गमाविली नोकरी
कोविड-19 महामारीमुळे आलेल्या आर्थिक संकटापायी आतापर्यंत 8.43 लाख लाग अनिवासी केरळमध्ये परतले आहेत. यातील सुमारे 5.52 लाख लोकांना स्वतःची नोकरी गमवावी लागली आहे. केरळ राज्य सरकारच्या अनिवासी केरळवासीय विषयक विभागाने यासंबंधी आकडेवारी जमविली आहे. यानुसार मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापासून 4 जानेवारीपर्यंत एकूण 8.43 लाख मल्याळी लोक विदेशातून केरळमध्ये परतले आहेत. नोकरी गमाविणाऱया एकूण लोकांपैकी 1.40 लाख लोकांची एक महिन्यातच नोकरी गेली आहे.
केरळमध्ये परतणाऱयांमध्ये रोजगार व्हिसा संपलेल्यांचे प्रमाणही अधिक आहे. सुमारे 2.08 लाख लोकांनी मायदेशी परतण्याचे कारण नोकरी संपुष्टात येणे असल्याचे म्हटले आहे.
अर्थव्यवस्थेवर प्रभाव
कोविड-19 मुळे निर्माण झालेले रोजगार संकट कायम राहिल्यास केरळच्या अर्थव्यवस्थेवर याचा दीर्घकालीन प्रभाव पडणार आहे. केरळच्या अर्थव्यवस्थेचा एक मोठा हिस्सा पश्चिम आशियात काम करणाऱया लोकांकडून पाठविण्यात येणाऱया रकमेचा असतो. यातील काही जण आता नव्या ठिकाणी कामाच्या शोधार्थ जातील, तसेच विदेशातून पाठविली जाणाऱया रकमेत घट होण्याची शक्यता कमी आहे.