सरकारकडून हालचाली सुरू- भारतात पुरवठय़ाचे संकट
कोरोना विषाणूच्या विरोधात भारतात मंजुरी मिळालेल्या लसींपैकी एक कोव्हॅक्सिंनसंबंधी सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. सरकार भारत बायोटेकच्या या लसीचे उत्पादन वाढविण्यासाठी विदेशात शक्यता शोधत आहे. लसींच्या कमतरतेदरम्यान तंत्रज्ञान हस्तांतरणाद्वारे काम सुरू केले जाऊ शकते असा दावा केला जातोय. भविष्यात अन्य भारतीय लसींकरता देखली असेच केले जाणार असल्याचे मानले जात आहे.
नव्या म्युटेशनच्या पार्श्वभूमीवर कोविड-19 लसींची मागणी पूर्ण करण्याची गरज आहे. यात स्वारस्य दाखविणाऱया देशांना कोव्हॅक्सिन पोहोचविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वित्तीय संस्थांदरम्यान हे उत्पादन तंत्रज्ञान हस्तांतरणाद्वारे केले जाणार असल्याचे एका अधिकाऱयाने म्हटले आहे. या प्रक्रियेचे नियम आणि अटी भारत बायोटेककडून निश्चित करण्यात येत आहेत.
भारतात तुटवडा
देशात सातत्याने नव्या कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अशा स्थितीत लसींची मागणी पूर्ण करण्यासाठी सरकार उत्पादन वाढविण्याच्या प्रयत्नांत आहे. मागली आठवडय़ात सरकारने सीरम इन्स्टीटय़ूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेकला 4500 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. कोव्हॅक्सिन ही लस भारत बायोटेक आणि आयसीएमआरने विकसित केली आहे. कंपनीने उत्पादन क्षमता वर्षाला 70 कोटी डोसपर्यंत वाढविण्याची घोषणा केली आहे. कोव्हॅक्सिन विषाणूच्या 617 संकरावतारांना निष्प्रभ करण्यास प्रभावी असल्याचे अमेरिकेतील आघाडीचे महामारी तज्ञ डॉक्टर अँथोनी फाउची यांनी यापूर्वीच स्पष्ट पेले आहे.