500 अब्ज डॉलर्सच्या पार : चीन-जपाननंतर सर्वाधिक प्रमाण : रशिया अन् दक्षिण कोरियाला मागे टाकले
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा विदेशी चलन साठा पहिल्यांदाच 500 अब्ज डॉलर्सच्या पार पोहोचला आहे. 5 जून रोजी समाप्त झालेल्या आठवडय़ात भारताचा विदेशी चलन साठा 8.22 अब्ज डॉलर्सने वाढून 501.70 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. तर यापूर्वी 29 मार्च रोजी समाप्त झालेल्या आठवडय़ात विदेशी चलन साठय़ात 3.44 अब्ज डॉलर्सची वृद्धी झाली होती.
वाढणाऱया विदेशी चलन साठय़ाचा वापर देशाच्या अर्थव्यवस्थेला विकासाच्या मार्गावर गतिमान करण्याच्या दिशेने केला जावा. सुमारे 30 वर्षांपूर्वी भारताचा विदेशी चलन साठा जवळपास शून्य झाला होता आणि तेव्हा विदेशातून आयातीसाठी सोने गहाण ठेवावे लागले होते. आता 30 वर्षांनी भारताकडे तिसऱया क्रमांकाचा विदेशी चलन साठा असल्याचे उद्गार महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी काढले आहेत.
तिसरा क्रमांक
विदेशी चलन साठय़ाप्रकरणी भारताने आता रशिया आणि दक्षिण कोरियाला मागे टाकले आहे. चीन आणि जपाननंतर भारताचा तिसरा क्रमांक लागतो. मागील आठवडय़ात राहिलेला 493 अब्ज डॉलर्सचा विदेशी चलन साठा पुढील 17 महिन्यांपर्यंतच्या आयातीकरता पुरेसा होता.
463.63 अब्ज डॉलर्सवर एफसीए
फॉरेन करेन्सी असेट्स (एफसीए) विदेशी चलन साठय़ातील महत्त्वाचा घटक असतो. 5 जून रोजी समाप्त झालेल्या आठवडय़ात एफसीए 8.42 अब्ज डॉलर्सने वाढून 463.63 अब्ज डॉलर्सपेक्षाही अधिक झाला आहे. विदेशी चलन साठय़ात बिगर अमेरिकन चलन म्हणजेच युरो, पौंड आणि येनच्या मूल्यातील उतार-चढावाला एफसीएत सामील केले जाते.
सुवर्णसाठय़ात किंचित घट
5 जून रोजी समाप्त झालेल्या आठवडय़ात सुवर्णसाठा 32.9 कोटी डॉलर्सने कमी होत 32.352 अब्ज डॉलर्सवर आला आहे. संबंधित आठवडय़ात भारताचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतील विशेष अधिकार 1 कोटी डॉलर्सने वाढून 1.44 अब्ज डॉलर्सचा झाला आहे. तर आयएमएफमध्ये भारताची राखीव हिस्सेदारीही 12 कोटी डॉलर्सने वाढून 4.28 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे.
एसअँडपीचा इशारा
भारताने निर्यातीतील घसरण रोखून देशाबाहेरील व्यापाराची स्थिती मजबूत करत राहणे गरजेचे आहे. निर्यातीतील घसरणीमुळे विदेशी चलन साठय़ात मोठी घट होऊ शकते आणि यातून चालू खात्यातील तूट वाढण्याचा धोका आहे. या घटकांमध्ये पुढील 12 महिन्यांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता नसल्याचे एसअँडपी पतमानांकन संस्थेने म्हटले आहे. परंतु कोविड-19 मुळे देशाच्या आर्थिक विकासदरावरील जोखम पाहता देशाचे पतमानांकन कमी होऊ शकते असा इशारा एसअँडपीने दिला आहे.