प्रतिनिधी/ बेंगळूर
कोरोना परिस्थितीमुळे शाळा अद्याप सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाबरोबरच ‘विद्यागम’ योजनेंतर्गत मुलांना अभ्यासामध्ये गुंतवून ठेवण्यासाठी राज्य शिक्षण खात्याने यशस्वी प्रयत्न केले आहेत. मात्र, अलिकडे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना विद्यागम योजनेमुळे कोरोना संसर्गाचा धोका असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय विरोधी पक्षनेते, पालकांनी तीव्र विरोध दर्शविल्यानंतर राज्य सरकारने या योजनेला तात्पुरती स्थगिती दिली आहे.
मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी सूचना दिल्यानंतर शनिवारी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी याबाबतची घोषणा फेसबुकवर केली आहे.
ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षण पद्धतीला म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नसल्याने शिक्षण खात्याने पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अभ्यास व अभ्यासपूरक कार्यक्रमामध्ये गुंतवून ठेवण्यासाठी विद्यागम योजना सुरू केली. राज्यभरात याला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. तथापि, 150 हून अधिक शिक्षकांचा कोरोनाने बळी गेला आहे. अनेक विद्यार्थी, शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. मागील दोन दिवसापासून प्रसिद्धी माध्यमांवर हे वृत्त झळकल्यानंतर पालक आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी विद्यागमला स्थगिती द्यावी, अशी जोरदार मागणी केली होती.
विधानसभा विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार, निजद वरिष्ठ नेते कुमारस्वामी तसेच अनेक आमदारांनी शिक्षण खात्याच्या या धोरणाविरुद्ध आवाज उठविला. त्यामुळे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी शिक्षणमंत्र्यांना विद्यागमला तात्पुरत्या कालावधीसाठी स्थगिती देण्याची सूचना केली. त्यामुळे शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी जिल्हानिहाय माहिती आणि योग्य तपशिल उपलब्ध होईपर्यंत विद्यागमला स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी शिक्षण खात्याच्या मुख्य सचिवांना याबाबत आदेश जारी करण्याची सूचना दिली आहे.
गुलबर्गा जिल्हय़ातील माशाळ येथील सरकारी प्राथमिक शाळेच्या पटांगणात मुलांना जमवून शिक्षण देण्यात येत होते. या शाळेतील एका शिक्षकामुळे चार विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त राज्यभर पसरल्यानंतर विद्यागम योजना स्थगित करण्याची मागणी वाढली. दरम्यान, बेळगाव जिल्हय़ात 57 शिक्षकांचा कोरोनाने बळी गेला. तर राज्यभरात 150 हून अधिक शिक्षकांचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे उघडकीस आले होते. अशा परिस्थितीत केंद्र सरकारच्या मार्गसूचीनुसार शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण खाते प्रयत्नशील असताना विद्यागममुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका असल्याने पालक आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. त्यामुळे सरकारने नरमाईची भूमिका घेत कार्यक्रमाला स्थगिती दिली आहे.
उत्तम प्रतिसाद; पण…
विद्यागम योजनेंतर्गत शिक्षकांकडून ऑनलाईन शिक्षणाबरोबरच मंदिरे, सभागृह, मोकळय़ा जागेत झाडाखाली अभ्यासविषयक मार्गदर्शन केले जात होते. योजनेला ग्रामीण भागात उत्तम प्रतिसाद मिळत होता. मागास असलेल्या खेडय़ांमध्ये बसेसची सुविधा, नेटवर्क सुविधा नसली तरी शिक्षक तळमळीने मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी पायपीट करताना दिसून येत होते. जागेअभावी सामाजिक अंतर राखणे शक्य होत नव्हते. दरम्यान, शिक्षकच पॉझिटिव्ह आढळून येत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
कसे आहे ‘विद्यागम’चे स्वरूप?
कोरोना परिस्थितीमुळे शाळा-महाविद्यालये अद्याप सुरू झालेली नाहीत. त्यामुळे मुले शाळा आणि शिक्षणापासून दूर जाऊ नयेत, याकरिता राज्य शिक्षण खात्याने औपचारिक शिक्षणाला पर्याय म्हणून मुले शाळेच्या नियमित संपर्कात राहण्यासाठी आणि निरंतर अध्ययन प्रक्रिया सुरू ठेवण्यासाठी स्वयंअध्ययन पद्धती सुरू करण्याचा निर्णय घेतला. या योजनेलाच ‘विद्यागम’ असे नाव देण्यात आले. ऑगस्टपासून ही प्रक्रिया सुरू झाली.
पहिली ते पाचवी, सहावी आणि सातवी तसेच आठवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे गट करणे व या गटानुसार 5 ते 6 विद्यार्थ्यांना एका ठिकाणी जमवून तेथे एका शिक्षकावर मार्गदर्शनाची जबाबदारी दिली जात होती. अशा गटांना आठवडय़ातून किमान एकदा मार्गदर्शन करणे, अभ्यास-अभ्यासपुरक उपक्रम देऊन मुलांचे लक्ष अभ्यासापासून विचलित होणार नाही याची दक्षता घेतली जात होती. मोबाईल, लॅपटॉप, इंटरनेट सुविधा नसलेल्या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमांतर्गत मार्गदर्शन करण्यास अधिक प्राधान्य देण्यात येत होते. शाळा किंवा शाळेच्या आवारात मुलांना न बोलवता त्यांच्या परिसरातील समुदाय भवन, मंदिरे, प्रशस्त जागेत एकत्र जमविण्याचा पर्याय सुचविण्यात आला होता. मुलांना आणि शिक्षकांना मास्क, सामाजिक अंतराची सक्ती करण्यात आली होती.