वार्ताहर/ कराड
विद्यानगर (ता.कराड) येथील राष्ट्रीय महामार्गावर दर वर्षी पावसाळयाच्या काळात तिन ते चार फुट पाणी साचत असल्याने रस्ता वहातुकीसाठी बंद रहात आहे. तर येथील रहिवाशांच्या घरात व शेतीत पाणी साठल्याने प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर साचणाऱया पाण्याचा निचरा करण्यासाठी महामार्ग प्रशासनाने आवश्यक ती उपाययोजन करावी अशी मागणी जिल्हा परीषद सदस्य सागर शिवदास यांनी केली आहे.
याबाबत प्रांतअधिकारी उत्तम दिघे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सैदापुर ग्रामपंचायत सदस्य लहुराज जाधव, गोवारेचे ग्रामपंचायत सदस्य संदिप पाटील, कृष्णत काळे, मेरवेवाडीचे सरपंच सुहास यादव, सामाजीक कार्यकर्ते मनोज माळी आदींची प्रमुख उपस्थीती होती.
सागर शिवदास म्हणाले की, कराड ते विटा या राष्ट्रीय महामार्गावर मोठया प्रमाणात वहातुक असते. मात्र दर वर्षी पावसाळयाच्या काळात कृष्णा कॅनॉल ते जे.के.पेट्रोल पंप दरम्यानच्या रस्त्यावर किमान तिन ते चार फुट पाणी साचते. गेल्या वर्षी हा रस्ता पाण्याखाली गेल्याने जवळपास पंधरा दिवस या रस्त्यावरील वहातुक बंद ठेवण्यात आली होती. या भागात रस्त्याच्या दुतर्फा मोठयाप्रमाणात लोकवस्ती आहे. मात्र रस्त्यावर साचलेले पाणी लोकांच्या घरात शिरते याचा येथील रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या परीसरातील शेतीतही पाणी साचल्याने शेतकऱयांचे मोठे नुकसान होत आहे. लोकांना जिव मुठीत घेवुन पाण्यातुन वाट काढावी लागत आहे. पाण्यातुन जाताना अनेक वहाने बंद पडुन लोकांना अर्थीक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
वास्तवीक राष्ट्रीय महामार्ग असतानाही या रस्त्याकडे महामार्ग प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. रस्त्यावर येणारे पाणी वाहुन नेण्यासाठी येथे सोय नाही. काही आंतरापर्यंत गटर आहेत. मात्र रस्त्यावर खुप मोठया प्रमाणात पाणी साचत असल्याने हे पाणी गटातीर बसत नाही. त्यामुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून पावसाळयात लोकांना होणार त्रास कमी करावा अशी मागणी सागर शिवदास यांनी केली आहे.