बेळगाव / प्रतिनिधी
अपुऱया पाणी पुरवठय़ाचा निषेध नोंदविण्यासाठी राणी चन्नम्मा विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी चक्क विद्यापीठाच्या दरवाजातच स्नान करून अभिनव आंदोलन छेडले. या प्रकारामुळे विद्यापीठाचा गलथान कारभार चव्हाटय़ावर आला आहे.
विद्यापीठाच्या वसतिगृहात राहणाऱया विद्यार्थ्यांना योग्यप्रकारे पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार सातत्याने करण्यात येत होती. दैनंदिन विनियोगासाठी तसेच पिण्यासाठीदेखील मुबलक पाणी उपलब्ध नसल्याने विद्यार्थी हवालदिल झाले होते. याबाबत वसतिगृहाचे वॉर्डन आणि इतर अधिकारीवर्गाला माहिती देऊनदेखील त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले होते. याबद्दल विद्यार्थीवर्गात संतप्त प्रतिक्रिया होती. याचा संताप व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी बुधवारी सकाळी बादल्या भरून लांबवरून पाणी आणले व विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोरच स्नान करून विद्यापीठ कुलगुरुंचा निषेध नोंदविला. अभ्यासाचे कर्तव्य पूर्ण करण्याऐवजी आम्हाला पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याचा निषेध नोंदविण्यासाठी हे आंदोलन छेडत असल्याची माहिती विद्यार्थीवर्गाने दिली..