प्रतिनिधी/ निपाणी/संकेश्वर
कोरोना महामारीमुळे तब्बल तीन महिने लांबलेली व होते की नाही या प्रश्नाभोवती फिरणारी दहावी परीक्षा अखेर गुरुवारपासून सुरु होत आहे. गेल्या तीन महिन्यातील चित्र पाहता देशभरात रुग्णसंख्या वाढतच चालली आहे. अशावेळी गुरुवारपासून होणारी दहावी परीक्षा ही केवळ विद्यार्थ्यांचीच नव्हे तर प्रशासनाचीही एकप्रकारे परीक्षाच असणार आहे.
परीक्षा सुरळीत व सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी शिक्षण खात्याबरोबरच आरोग्य, पोलीस खातेही सतर्क झाले आहे. निपाणी शैक्षणिक तालुक्यात एकूण 4 हजार 25 विद्यार्थी 12 केंद्रांच्या माध्यमातून परीक्षा देणार आहेत. यापैकी 8 परीक्षा केंद्रे ग्रामीण भागात तर 4 केंद्रे निपाणी शहरात आहेत. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून प्रत्येकी दोन मास्क देण्यात आले आहेत तर महाराष्ट्रातून आलेल्या विद्यार्थ्यांना एन-95 प्रकारचे मास्क देण्यात येणार आहेत.
परीक्षेच्या पार्श्वभूमीवर बेळगाव डाएटचे प्राचार्य व दहावी परीक्षा विभागाचे वरीष्ठ अधिकारी सिंधूर यांनी मंगळवारी निपाणीतील परीक्षा केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी परीक्षेच्या नियोजनाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचाही आढावा घेतला. यावेळी अधिकारी व कर्मचाऱयांनी परीक्षा सुरळीत व्हावी यासाठी काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.
हुक्केरी तालुक्यात सर्व तयारी पूर्ण
संकेश्वर : तब्बल तीन महिन्यानंतर दहावी केंद्र परिक्षांना आज गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. हुक्केरी तालुक्यातून 6470 परिक्षार्थीच्या बैठकीची सोय करण्यात आली आहे. यंदा कोरोना व्हायरसमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुष्कळसा वेळ मिळाला आहे. परीक्षेसाठी निर्माण करण्यात आलेल्या 25 केंद्रातील प्रत्येक खोल्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. शिवाय परिक्षेला येणारा प्रत्येक विद्यार्थी केंद्रात प्रवेश करताच त्यांचे थर्मल स्पॅनिंग करून, सॅनिटायझर देवून वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही सीसी कॅमेऱयांची नजर असणार आहे. शिवाय सामाजिक अंतर ठेवण्यात आले आहे.
निर्भयपणेपरीक्षा द्या प्रत्येक विद्यार्थ्याने परीक्षा कालावधीत शांतपणाने प्रश्नपत्रिकेचे वाचन करुन उत्तरपत्रिका अचूक लिहावी. कोणतीही भीती बाळगू नये. निर्भयपणे पेपर लिहावा, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी एम. एन. दंडीन यांनी केले आहे.