वार्ताहर/ म्हसवड :
लॉकडाउनच्या कालावधीत सर्वच बंद असल्याने नवीन शैक्षणिक वर्षाच्या पुस्तकांची तसेच वह्या छापण्याची प्रकियाही थांबली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना लॉकडाउन नंतर लवकर पुस्तके मिळतील याबाबत साशंकता निर्माण झाल्यामुळे जुनी पुस्तके जपून ठेवा, असा संदेश शिक्षकांमार्फत दिला जात आहे.
आपली पाठय़पुस्तके जपून ठेवा, तुमची पुस्तके परत एकदा नव्याने शिकण्यासाठी कुणालातरी उपयोगी पडतील ती जपून ठेवा, दुसऱया एका विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी तुमची जुनी पुस्तके उपयोगी पडतील. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपआपली जुनी पुस्तके जपून ठेवा, असा संदेश काही शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांना व पालकांना पाठवला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांमध्ये संचारबंदी व जमावबंदी असून शाळा, महाविद्यालये, सर्व कारखाने, व्यापार असे सर्वकाही बंद आहे. घरात रहा सुरक्षित रहा, असा संदेश देऊन प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. त्यामुळे राज्य शासन इयत्ता 1 ली ते (दहावी फक्त भूगोल) ते 11 वीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा न घेता पुढच्या वर्गात विद्यार्थ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. महाविद्यालयाच्या अद्याप परिक्षे संदर्भात निर्णय झालेला नाही. लॉकडाउनमुळे सर्व बंद असल्याने वह्या, पुस्तके छपाई देखील बंद आहे. त्यामुळे पालकांनी व विद्यार्थ्यांनी आपली पुस्तके जपून ठेवा, वहीची शिल्लक पाने एकत्र करा व दुसरी वही तयार करा. भविष्यात आपणास ती उपयुक्त ठरेल. कोरोनाचा हा लढा कुठेपर्यंत चालेल, या बाबतीत सध्या तरी सर्वजण अनभिज्ञ आहेत.