तब्बल नऊ महिन्यानंतर कर्नाटकात शाळा-कॉलेज सुरू झाली आहेत. खबरदारी घेत शाळा सुरू ठेवल्या तरच यंदा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता येणार आहे. अन्यथा पूर्णपणे शिकवणी न घेताच परीक्षा द्यावी लागणार आहे.
तब्बल नऊ महिन्यानंतर कर्नाटकात शाळा-कॉलेज सुरू झाली आहेत. दहावी-बारावीचे वर्ग रोज किमान दोन तास भरविण्याचा उपक्रम सुरू झाला आहे. सरकारच्या या निर्णयाला पालकांनीही साथ दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढती आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षक व इतर कर्मचाऱयांची स्वॅब तपासणी करण्यात आली होती. आता हळूहळू त्यांचे अहवाल येऊ लागले आहेत. 125 हून अधिक शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्या ज्या शाळेत शिक्षकांना कोरोना झाला आहे, त्या शाळा पुन्हा आठवडाभरासाठी बंद ठेवण्यात येत आहेत. खरे तर शिक्षण व आरोग्य खात्याच्या अनागोंदीमुळे ही समस्या निर्माण झाली आहे. शिक्षणमंत्री सुरेश कुमार यांनी यासंबंधी अहवाल मागविला आहे.
1 जानेवारीपासून दहावी-बारावीचे वर्ग सुरू करणार, हे किमान 15 दिवस आधी ठरले होते. त्याचवेळी शिक्षक, कर्मचाऱयांची स्वॅब तपासणी झाली असती तर शाळा सुरू होण्याआधी त्यांचे अहवाल आले असते. केवळ 1-2 दिवस अगोदर स्वॅब देण्यात आले. तपासणी करणाऱयांची संख्या वाढल्यामुळे साहजिकच अहवाल येण्यास 5-6 दिवस विलंब होतो आहे. अहवाल येईपर्यंत शाळेला येण्यास तुम्हाला कोणी सांगितले असा प्रश्न आता बाधित शिक्षकांना विचारला जाऊ लागला आहे. आरोग्य विभागाने शिक्षक व कर्मचाऱयांसाठी तपासणीची स्वतंत्र व्यवस्था करून वेळेत अहवाल मागविला असता तर यासंबंधी गोंधळ माजला नसता. सर्व काही झाल्यानंतर त्याची चौकशी करण्याचे आदेश देण्याऐवजी आधीच नियोजन केले असते तर कोणालाच त्रास झाला नसता. मात्र, सद्यस्थितीत काय करावे आणि काय करू नये, या गोंधळात राज्य सरकार आहे, हे दिसून येते. दहावी-बारावीचे वर्ग सुरू होऊन 8 दिवस पूर्ण झाले. परीक्षेचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मे च्या दुसऱया आठवडय़ात बारावी आणि जूनच्या पहिल्या पंधरवडय़ात दहावीची परीक्षा घेण्याचे शिक्षणमंत्री सुरेश कुमार यांनी जाहीर केले आहे. लवकरच तपशीलवार वेळापत्रक जाहीर होणार आहे. नऊ महिन्यानंतर शाळा सुरू झाल्या आहेत. मे-जून परीक्षा घेणार तर 4-5 महिनेच शिकवणी होणार आहे. गेल्या 8 दिवसांचा विद्यार्थ्यांचा अनुभव लक्षात घेता आम्हाला आता वेळ नाही. वेळ अपुरा आहे. त्यामुळे आम्ही सर्व काही शिकवत बसणार नाही. तुम्ही यु-टय़ूब बघून शिका. गाईड बघून अभ्यास करा, असे सल्ले अनेक शाळांमधून शिक्षक देऊ लागले आहेत. अभ्यासक्रमात कपात करणार असे शिक्षणमंत्री वारंवार सांगत असले तरी किती टक्क्मयांनी कमी करणार, विद्यार्थ्यांना काय शिकविणार, कोणत्या अभ्यासक्रमावर त्यांची परीक्षा घेणार, हे अद्याप ठरलेले नाही. त्यामुळे शिकवणी न घेताच यंदा परीक्षा देण्याची वेळ विद्यार्थ्यांवर येणार आहे.
5-5 महिन्यात शाळेत जे शिकविले जाईल, त्यावर परीक्षा घेतली तर विद्यार्थ्यांना अनुकूल ठरणार आहे. सरकार व शिक्षण खात्याची सध्याची तयारी लक्षात घेता काही न शिकवताच परीक्षा घेण्यासाठी तयारी सुरू आहे, हे दिसून येते. कोरोना महामारीचा फैलाव कमी होत असतानाच ब्रिटनमधून आलेल्या सुधारित अवताराची भीती असूनही पालकांनी धोका पत्करून आपल्या मुलांना शाळेत पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. मुलांना काही झाले तरी पालकच जबाबदार, असे लिहून घेऊन शाळा भरविण्यात येत आहे. याचा अर्थ सरकारची काहीच जबाबदारी नाही का? एखादा वर्ग भरल्यानंतर स्वच्छतेवर भर द्यायला हवा. सुरुवातीचे 1-2 दिवस अनेक शाळांमधून वैयक्तिक व शाळा खोल्यांच्या स्वच्छतेवर कटाक्षाने भर देण्यात आला. केवळ आठवडाभरात त्याचा विसर पडल्याचे दिसून येते. सरकारने शाळा सुरू करण्याचा घेतलेला निर्णय व पालकांनी कोरोनाची भीती बाजूला ठेवून आपल्या मुलांना शाळेला पाठविण्यासाठी केलेली तयारी यामुळे शाळा आवारे गजबजू लागली आहेत. एक सकारात्मक वातावरण तयार होत असतानाच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे काय होणार? कोणत्या अभ्यासक्रमावर त्यांना परीक्षा द्यावी लागणार, याची कसलीच तजवीज केलेली नाही. शिक्षणमंत्री सुरेश कुमार हे सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी आग्रही आहेत. कठीण प्रसंगातही त्यांनी गोरगरीब मुलांसाठी विद्यागम योजना राबविली. सध्याचा संभ्रम दूर करण्यासाठी सरकारला ठोस पाऊल उचलावे लागणार आहे. कोरोनाचा फैलाव आटोक्मयात येत असतानाच केरळमध्ये बर्ड फ्लूची साथ पसरली आहे. कर्नाटकातही साथ पसरल्यास त्याचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. खासकरून केरळच्या सीमेवरील मंगळूर, कोडगू, म्हैसूर, चामराजनगर परिसरात खबरदारी वाढविण्यात आली आहे. साहजिकच त्याचा फटका कुक्कुटपालन व्यवसायाला बसणार आहे. 2020 मधील कटू अनुभव बाजूला ठेवून गावगाडा रूळावर येत असतानाच पुन्हा एका संकटाचा सामना करावा लागणार की काय, अशी भीती वाढली आहे. या आपत्तींवर मात करीत अर्थचक्राला पुन्हा चालना देण्यासाठी प्रत्येकानेच आपली जबाबदारी चोखपणे पार पाडायची असते. गुरुवारी दुपारपर्यंत राज्यातील बाधित शिक्षकांचा आकडा 125 हून अधिक होता. तरीही शाळा सुरू ठेवण्यासाठी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांची मन:स्थिती खंबीर आहे. अनेक जिल्हय़ात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचेही अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. खबरदारी घेत शाळा सुरू ठेवल्या तरच यंदा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता येणार आहे. अन्यथा पूर्णपणे शिकवणी न घेताच परीक्षा द्यावी लागणार, हे स्पष्ट आहे.
रमेश हिरेमठ