धोकादायक प्रवास सुरूच, विद्यार्थ्यांची गैरसोय : जादा बस सोडण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
शहर आणि ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या तुलनेत बसफेऱयांची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. बसच्या दरवाजात लोंबकळत कसरत करावी लागत आहे. मागील कित्येक दिवसांपासून हीच परिस्थिती आहे. मात्र याबाबत परिवहनला कोणतेही गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे बसप्रवासात विद्यार्थ्यांची फरफट कधी थांबणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बसने प्रवास करणाऱया विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. विशेषतः सकाळी व सायंकाळी बसना गर्दी वाढत आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना बसच्या दरवाजात थांबूनच प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. शहरातील यंदे खूट, आरपीडी कॉर्नर, धर्मवीर संभाजी चौक, चन्नम्मा चौक आदी ठिकाणी विद्यार्थ्यांची वर्दळ अधिक असते. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी या ठिकाणी बसना गर्दी वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना लोंबकळतच प्रवास करावा लागत आहे. सकाळी आणि सायंकाळच्या वेळेत बसफेऱया कमी असल्याने बसमध्ये चढण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड सुरू होते. दरम्यान विद्यार्थी बसमध्ये चढण्यासाठी चढाओढ करतात. बसमध्ये जागा पकडण्यासाठी बसच्या पाठीमागे धावत सुटतात. त्यामुळे मोठा अपघात घडण्याची शक्मयता आहे. परिवहनने प्रवाशांचा सर्व्हे करून सकाळी आणि सायंकाळच्या वेळेत बसफेऱया वाढवाव्यात, अशी मागणी होत आहे.
प्रवासी तासन्तास बसच्या प्रतीक्षेत ताटकळत…
कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदा सुरळीत शाळा-महाविद्यालयांना सुरुवात झाली आहे. दरम्यान दैनंदिन प्रवासासाठी हजारो विद्यार्थ्यांनी बसपास काढले आहेत. मात्र वेळेत बस मिळत नसल्याने काही विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे आर्थिक फटकाही सहन करावा लागत आहे. काही मार्गांवर रिकाम्या बस फिरताना दिसत आहेत. तर काही ठिकाणी प्रवाशांना तासन्तास बसच्या प्रतीक्षेत ताटकळत थांबावे लागत आहे. त्यामुळे प्रवाशांची संख्या अधिक असलेल्या मार्गावर जादा बस सोडाव्यात, अशी मागणी होत आहे.