प्रतिनिधी/ बेळगाव
विद्यागम 2 प्रणालीला प्रारंभ झाला आहे. यामुळे ‘स्कूल चले हम’ म्हणत विद्यार्थी शाळेत हजेरी लावत आहेत. मात्र, सदर हजेरीची नोंद सरकारदरबारी अचूक केली जात असून विद्यार्थी शाळेत ऑनलाईन की ऑफलाईन उपस्थित आहेत, याचा लेखाजोखा ऑनलाईनच ठेवण्याची जबाबदारी शिक्षकांवर आली आहे. दररोजची विद्यार्थ्यांची हजेरी एसटीएस प्रणालीच्या माध्यमातून नोंद करण्याच्या सूचना करण्यात आल्या असून त्यानुसार विद्यागम प्रक्रिया पूर्ण होताच शिक्षकांकडून हजेरी नोंदविली जात आहे.
विद्यार्थ्यांच्या संपूर्ण माहितीचा आलेख असणारे एसटीएस सिस्टीम विद्यार्थ्यांच्या सविस्तर नोंदीचा आराखडा आहे. यामुळे 2020-21 या शैक्षणिक वर्षात 1 जानेवारीपासून सुरू झालेले विद्यागम 2 देखील कशा पद्धतीने सुरू आहे, याची माहिती नोंदविण्यासाठी हजेरी ऑनलाईन एसटीएसमध्ये ठेवली जात आहे.
विद्यार्थ्यांचा प्रतिसाद समाधानकारक सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांचा प्रतिसाद समाधानकारक असून विद्यागमच्या ऑफलाईन वर्गाला विद्यार्थी एक दिवसाआड इ. 6 वी ते 8 वीनुसार उपस्थित राहत आहेत. त्यातही विद्यार्थी संख्या कमी असल्यास दोन्ही वर्गांना बोलाविण्याची मुभा असल्याने विद्यार्थ्यांचा प्रतिसाद समाधानकारक आहे. त्यातही शाळेत हजर- गैरहजरच्या नोंदी असल्याने दोन्हीपैकी किमान एक शिक्षण पद्धती अवलंबिण्याखेरीज विद्यार्थ्यांना पर्याय नसून यामुळे विद्यार्थी शाळेशी जोडले जाणार आहेत.