प्रतिनिधी/ रत्नागिरी
केंद्रीय पोषण आहार पुरवठय़ाची सोमवार 1 ऑगस्टपासून रत्नागिरी शहरातील शाळांमधून अंमलबजावणी सुरू झाली. मात्र पहिल्याच दिवशी या योजनेचा काही ठिकाणी गोंधळ उडाला. येथील रा.भा.शिर्के प्रशालेत नियुक्त ठेकेदार संस्थेने विद्यार्थ्यांना अर्धवट शिजलेला भात व दर्जाहिन आहाराचे वाटप केले. विद्यार्थ्यांनी हा आहार तोंडात न घेताच बाहेर फेकून दिला. मुलांच्या तक्रारीची शाळा प्रशासनाने गंभीर दखल घेत ही बाब तात्काळ न. प. शिक्षण मंडळाच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे शिक्षण मंडळाच्या अधिकाऱयांचीही धावाधाव झाली. या प्रकाराने विद्यार्थ्यांना दर्जेदार पोषण आहार देण्यावर मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.
शासनाच्या नव्या धोरणानुसार शालेय पोषण आहाराचे वाटप बचत गटाकडून काढून घेण्यात आले. रत्नागिरी शहरातील शाळांसाठी पोषण आहारात बचत गटाकडून दरदिवशी शुद्ध, ताजे, गरम व उत्कृष्ठ पद्धतीचे भोजन पुरवले जात होते. मात्र केंद्रीय पोषण आहार पध्दतीने निविदा प्रक्रिया राबवून परजिह्यातील तीन संस्थांमार्फत आहार पुरवठा सुरू करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना पोषण आहार वाटपासाठी नव्याने नियुक्त संस्थेने शिर्के प्रशालेत सोमवारी पहिल्याच दिवशी केलेल्या आहार वाटपातील अजब प्रकार समोर आला. संस्कार महिला मंडळ कोल्हापूर या संस्थेने चक्क कच्चा भात विद्यार्थ्यांना वाढला. त्यात डोक्यातील केसही सापडल्याची बाब शिक्षकांच्या निदर्शनास आली.
विद्यार्थ्यांनी हा आहार न खाता त्याची तक्रार शाळा प्रशासनाकडे केली. ताटातील भात विद्यार्थ्यांनी चक्क बाहेर फेकून दिला. या प्रकाराची व विद्यार्थ्यांच्या तक्रारीची शाळेचे मुख्याध्यापक रमेश चव्हाण यांनी गंभीर दखल घेतली. आहाराची शहानिशा केली असता आहार दर्जाहिन असल्याचे निदर्शनास आले. यामुळे त्याचे वाटप तत्काळ थांबवले. नव्याने नेमलेल्या संस्थेने कच्चा भात पुरवल्याची माहिती मिळाल्यानंतर शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी सुनिल पाटील यांना याची माहिती देण्यात आली. पाटील यांनी शाळेला भेट देऊन घडल्या प्रकाराची पाहणी केली. त्यांनीही ठेकेदाराला आहार पुरवठा थांबण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर दुसऱया ठेकेदार संस्थेकडून पोषण आहार मागवण्यात आला व पुन्हा आहाराचे वाटप सुरु झाले. मात्र य गोधळात मुलांना तब्बल तासभर आहाराची प्रतीक्षा करण्याची वेळ आली. त्यामुळे विद्यार्थी भूकेने व्याकूळ झाले होते.
विद्यार्थ्यांनीच स्वच्छ केली ताटे
या साऱया गोंधळात प्रशालेतील शैक्षणिक तासिकेतील दोन तास वाया गेले. या गोंधळात सकाळ सत्रातील अनेक विद्यार्थी पोषण आहार न घेताच घरी निघून गेल्य़ाचे सांगण्यात आले. विद्यार्थ्यांना भात बाहेर फेकून दिल्यामुळे शाळेत भाताचा सडा पडला होता. संस्थांना ठेका देताना पोषण आहाराची ताटे संस्थेन आपल्या कर्मचाऱयांमार्फत स्वच्छ करण्याची अट आहे. पण शिर्के प्रशालेत पोषण आहार देणाऱया ठेकेदार संस्थेने विद्यार्थ्यांनाच त्यांची ताटे स्वच्छ करायला लावल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.
या दर्जाहीन पोषण आहाराच्या वाटपात पुरवठादार संस्थेने निष्काळजीपणा दाखवल्याचे समोर आले. विद्यार्थ्यांना आहार वाटप करताना न.प. शिक्षण मंडळ प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष आहे की नाही असा सवाल आता पालकातून केला जात आहे. मुलांनी केलेल्या तक्रारीनंतर मुख्याध्यापकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड झाल्यानंतर न.प. शिक्षण मंडळाच्या यंत्रणेमध्येही खळबळ उडाली आहे. त्यामुळे शालेय पोषण आहाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रत्नागिरी शहरातील पालिका हद्दीतील विद्यार्थ्यांना यापूर्वी शासनाकडून धान्य पुरवठा झाल्यानंतर शाळेने नेमलेल्या बचत गटाकडून आहार तयार करुन त्याचे शाळेतच वाटप केले जात होते. यामध्ये बचत गटाच्या माहिला घरगुती अन्नाप्रमाणे दर्जेदार अन्नाचे विद्यार्थ्यांना वाटप होत होते. पण नव्या संस्थांमार्फत शालेय पोषण पुरवठा करण्याची अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर पहिल्याच दिवशी गेंधळ झाल्याने अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत