प्रतिनिधी/ सोलापूर
शासन आदेशानुसार सोमवारपासून शासनमान्य विनाअनुदानित, अनुदानित सर्वच नववी ते बारावीपर्यंत शाळा व महाविद्यालय सुरू होणार आहेत. जिह्यातील सर्व शाळा कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर सर्व तयारीने सज्ज असून, ग्रामीण भागातील 80, तर शहरातील 50 टक्के पालकांनी संमती दर्शविली आहे. शाळेत प्रवेश करताना शिक्षकांना टेस्ट बंधनकारक असले तरी विद्यार्थ्यांची फक्त ताप, थंडीची तपासणी करण्यात येणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक स्वरुपात 9 ते 12 वी इयत्तेचे गणित, इंग्रजी व विज्ञानाचे वर्ग सुरू करण्यात येत आहेत. शहरात एकूण 154 शाळा असून, या शाळांमध्ये 9 ते 12 वर्गात शिकणाऱयांची संख्या साधारण 80 हजारांच्या आसपास आहे. या तीन विषयांच्या अध्यापनासाठी प्रत्यक्षात 1 हजार 124 शिक्षकांची उपस्थिती असणार आहे. आजपर्यंत प्राप्त झालेल्या संमती पत्रानुसार 50 टक्के पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्याबाबत संमती दर्शविली आहे. ग्रामीण भागात शाळा भरविण्यासाठी 80 टक्के पालकांची संमती दिली. जिह्यात 1 हजार 87 शाळा आहेत. या शाळांमध्ये 9 ते 12 वी वर्गात शिकणाऱयांची संख्या 2 लाख 52 हजार 434 इतकी आहे. गणित, विज्ञान, इंग्रजी या तीन विषयांच्या अध्यापनासाठी प्रत्यक्षात 3 हजार 500 शिक्षकांची उपस्थिती असणार आहे. स्वच्छतागृहांची स्वच्छता, सॅनिटायझेशन, मैदान निर्जंतुकीकरण आदीबाबतच्या सूचना संस्थाचालक व मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. श्राविका प्रशाला व जैन गुरुकूल प्रशालेला अचानक भेट देऊन पाहणी करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षण विभागाने दिली.
हे असणार नियम
– शिक्षकांची कोरोना चाचणी करणे बंधनकारक
– विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेशापूर्वी थर्मलस्कॅनिंग, ऑक्सिमीटर, सॅनिटायझर करणे बंधनकारक. कोरोना चाचणीची सक्ती नाही
– एका वर्गात 20 याप्रमाणेच विद्यार्थी बसण्याची व्यवस्था
– जेवणासह कोणतीच मधली सुट्टी होणार नाही
– विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी पालकांनीच ने-आण करणे गरजेचे
दहावीची 17 केंद्रे, 906 विद्यार्थी परीक्षेला बसणार
बारावीच्या 8 केंद्रांतून 1 हजार 422 विद्यार्थ्यांचा सहभाग
विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा
जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱयांच्या मार्गदर्शनानुसार जिह्यातील सर्व शाळा कोविड-19 नियमानुसार स्वच्छता करून घेण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागात पालकांचाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ज्यांचे आरोग्य चांगले नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शाळाही सुरू राहणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. त्यामुळे सोमवारी शाळा भरणार, यात शंका नाही.
-भास्करराव बाबर, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग