प्रतिनिधी/ बेळगाव
विद्यार्थ्यांना यापुढे लॅपटॉपऐवजी टॅब देण्याबाबत सरकार विचार करत आहे. हा निर्णय प्रत्यक्षात आल्यास 1.55 लाख विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱया लॅपटॉपची योजना बंद करून टॅब देण्याचा विचार पुढे आला आहे. तांत्रिक आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी ही योजना लागू होणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 1.55 लाखहून अधिक विद्यार्थी यासाठी पात्र असून त्यापैकी 44 हजार 326 अनुसूचित जाता-जमातींचे असून 91 हजार 210 मागासवर्गीय, 10 हजार 977 अल्पसंख्याक आणि 8 हजार 883 सर्वसामान्य गटातील आहेत. या योजनेसाठी समाज कल्याण खात्याची मदत घेण्यात येणार असून यासाठी 44.32 कोटी खर्च समाज कल्याण खाते उचलणार आहे. मागासवर्गीय कल्याण मंडळ 91.21 कोटी, अल्पसंख्याक मंडळ 10.98 कोटी खर्च उचलणार आहे. तांत्रिक शिक्षण मंडळातर्फे सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी 8.88 कोटी देण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी या योजनेला हिरवा कंदील दाखविला आहे. मात्र, या खात्यांना सांगण्यात आलेल्या निधीमध्येच ही योजना अंमलात आणावयाची आहे. त्यासाठी अन्य कोणताही निधी दिला जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले. जानेवारी 2021 मध्ये या योजनेसाठी निविदा काढण्यात येणार असून या योजनेमुळे खासगी आणि सरकारी महाविद्यालयांतील दरी कमी होणार आहे, असे सरकारला वाटते.