ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात 9 वी ते 12 वी च्या शाळा उद्यापासून (दि.23) सुरू होत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूर्णतः खबरदारी घेऊन शाळा सुरू करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. तरी देखील शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची सक्ती असणार नाही, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.
तनपुरे म्हणाले, ज्या शहरात कोरोनाचा संसर्ग जास्त आहे, त्या शहरांनी शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, ज्या भागातील शाळा सुरू होतील, तेथे विद्यार्थ्यांना शाळेत येण्याचे बंधन नसेल. विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीनेही शिक्षण घेऊ शकतात.
ज्या शहरात कोरोनाचा उद्रेक झाला असेल, तेथील शाळा सुरू करणे अथवा बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात येईल, असेही तनपुरे म्हणाले.