बेळगाव / प्रतिनिधी
कोरोनामुळे अनेक दिवसांपासून बंद असलेली महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यानुसार राज्यातील पदवी, पदव्युत्तर महाविद्यालये मंगळवारपासून सुरू झाली. मात्र बस आणि बसपासची सुविधा नसल्याने अनेक विद्यार्थी महाविद्यालयात हजर होताना अडचणी निर्माण होत आहेत. राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात पदवी व पदव्युत्तर महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आता विद्यार्थ्यांना 10 डिसेंबरपर्यंत महाविद्यालयातून देण्यात आलेली शुक्ल पावती व जुना पास दाखवून बसप्रवास करता येणार आहे.
दरवषी शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली की परिवहन मंडळाकडून विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात बसपास उपलब्ध करून दिला जातो. मात्र यंदा कोरोनामुळे शाळा महाविद्यालये बराच काळ बंद होती. त्यामुळे बसपासच्या कामाला देखील स्थगिती मिळाली होती. दरम्यान विद्यार्थ्यांना राज्य परिवहन महामंडळाने सवलत दिली आहे. 2019-20 या वर्षात देण्यात आलेल्या बसपासची मुदत 10 डिसेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
परिवहन मंडळाच्या या निर्णयामुळे पदवी, पदवीव्युत्तर डिप्लोमा, अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. राज्यातील विद्यापीठे, स्वायत्त विद्यापीठे, पदवी, वैद्यकीय अभियांत्रिकी, डिप्लोमा महाविद्यालये 17 नोव्हेंबरपासून सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी केएसआरटीसीने 2019-20 या वर्षात विद्यार्थ्यांना वितरित केलेल्या बसपासची मुदत 10 डिसेंबरपर्यंत वाढविली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षात शिकत असलेल्या महाविद्यालयातील शुल्क भरणा केलेली पावती आणि मागील वर्षी वितरित केलेला पास दाखवून बसमधून प्रवास करता येणार आहे.