जान्हवी पाटील/ रत्नागिरी
‘आई-बाबा’ तुम्ही तंबाखूपासुन दूर रहा…आम्हाला तुम्ही हवे आहात…तुम्ही तंबाखू खाता म्हणून मित्रमैत्रिणी चिडवतात… तुम्ही सांगाल ते ऐकू पण तंबाखू खावू नका… अशी मुलांकडून होणाऱया सातत्यपुर्ण विनंतीनंतर 20 पालकांनी तंबाखूजन्य पदार्थ आणि मद्यपानाला कायमचा रामराम ठोकला. आपल्या पालकांना तंबाखूच्य व्यसनापासून परावृत्त करणाऱया या 20 विद्यार्थ्यांचा मुंबई सलाम फौंडेशनकडून महाराष्ट्र भूषण म्हणून सन्मान केला जाणार आहे. यामध्ये रत्नागिरीतील 9 मुलांचा सहभाग आहे.
जागतिक कर्करोग दिनानिमित्त मंगळवारी जिल्हय़ातील शाळांमध्ये ‘तंबाखूची प्रतिकात्मक होळी’ हा उपक्रम राबवलण्यात आला. विशेष म्हणजे हा व्यसनमुक्तीचा उपक्रम राबवताना यामध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून शिक्षण विभागाने एक वेगळा उपक्रम सलाम फौंडेशनच्यावतीने राबवला. आधी आपल्या कुटुंबातील व्यक्तींना कोणतेही तंबाखूजन्य पदार्थ सेवन करू नका सांगा तरच हे अभियान यशस्वी होईल असे सांगण्यात आले. या सूचना बहुतांश विद्यार्थ्यांनी गांभिर्याने घेतले.
आपल्या घरात आई, बाबा, भाऊ कोणी तंबाखूजन्य पदार्थ खावू नये यासाठी मुलांनी मोहीमच सुरू केली. आमच्यासाठी तुमचे आयुष्य अनमोल आहे, तुम्ही आम्हाला हवे आहात या मुलांच्या विनवणीचा सकारात्मक परिणाम पालकांवच्र झाला. यात 20 मुलांच्या पालकांनी तंबाखूजन्य पदार्थ सोडल्याची नोंद संबंधित शाळा आणि शिक्षण विभागाकडे झाली आहे. याचा एक स्वतंत्र अहवाल तंबाखूमुक्ती काम करणाऱया सलाम फौंडेशने तयार केला. आपल्या पालकांना तंबाखूमुक्त करणाऱयांमध्ये सिंधुदुर्ग जिल्हय़ातील 6, रत्नागिरीतील 9 आणि रायगड जिल्हय़ातील 5 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
जिल्हा शिक्षण विभाग, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, सलाम मुंबई फाउंडेशन महाराष्ट्रात प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये तंबाखूमुक्त अभियान राबवत आहे. याच उपक्रमांतर्गत मुलांना या अभियानात सहभागी करून घेवून एक वेगळा पायंडा जिल्हा परिषद शिक्षण विभागाने पाडला.
जिह्यातील स्थानिक संस्था, संघटनांच्या प्रयत्नांतून यवतमाळ आणि वर्धा जिह्यांतील जिल्हा परिषद शाळा तसेच नंदुरबार व धुळे जिह्यांतील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळा तंबाखूमुक्त जाहीर झाल्या आहेत. यावर्षीही राज्यातील 10 जिल्हे तंबाखूमुक्त शाळांचे जिल्हे म्हणून घोषित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मागील 2 वर्षे जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधत शालेय शिक्षण विभागाच्या पुढाकारात तंबाखूविरोघी उपक्रम महाराष्ट्रात आयोजित केले जात असल्याची माहिती मुंबई सलाम फौंडेशनने ‘तरूण भारत’शी बोलताना दिली.
तंबाखूजन्य पदार्थांची होळी
मंगळवारी रत्नागिरीसह काही जिल्हयांमध्ये शाळेत तंबाखूजन्य पदार्थांची प्रतिकात्मक होळी करण्यात आली. यावेळी शिक्षण विभागाकडून तंबाखूमुक्त जीवनाचा संकल्प घेण्यात आला. त्याआधी शिक्षक विद्यार्थ्यांना तंबाखूचे होणारे दुष्परिणाम, तंबाखू व्यसन सोडण्याचे फायदे आणि युक्त्या याविषयी चर्चा केली आणि आपले कुटुंब व्यसनमुक्त राखण्यासाठी प्रेरणा दिली. या उपक्रमामुळे ज्या विद्यार्थ्यांचे पालक, तंबाखूजन्य पदार्थ सोडतील आणि 15 ऑगस्ट 2020पर्यंत तंबाखूमुक्त राहतील, त्या विद्यार्थ्यांना सलाम मुंबई फाउंडेशनकडून ‘महाराष्ट्रभूषण’ आणि मार्गदर्शक शिक्षकांचा ‘सन्मानपत्र’ 2 ऑक्टोबरला प्रदान करण्यात येईल.